Wednesday 28 October 2015

मेळघाट डायरी; एक दिवस - एक अनुभव.


सकाळी साधारण ७-७.३० ला निघालो आम्ही. मी आणि मधूभाऊ. बाइकशिवाय पर्याय नव्हता. खरंतर, या अश्या दुर्गम भागात ‘तिच्या’मुळे बरीच काम करण शक्य झाली आहेत. मेळघाट,म्हणजे अमरावतीहुन पुढे ५-६ तासांच्या प्रवासावर, सातपुड्याच्या कुशीतील व्याघ्र प्रकल्पातील हा भाग. रामभाऊ, चंदुभाऊ, मधुभाऊ आणि इतर हे इथे आले ते १९९८ साली. टारगेट होतं ते अर्थातच कुपोषण आणि पर्यायाने आरोग्य. आज २०१४ साली मी आणि इतर स्वयंसेविका/सेवक आलो होतो ते येथील ‘गावमित्रांना’ प्रशिक्षण देण्यासाठी. मधुभाऊ त्यांना  शिकवणार की गावाचा नकाशा कसा बनवायचा,आरोग्याविषयीचे सर्वेक्षण कसे करायचे इत्यादी. आम्ही शिकवणार होतो की प्राथमिक शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थिनिना कृतियुक्त शिक्षण कसे द्यायचे ते.“फार कठीण नसाव्यात गोष्टी”...असं प्रथमदर्शनी वाटेलही.पण तिथे गेल्यावर कळत इथल्या स्टेशनरीच्या दुकानात जाऊन वही-पुस्तक घेण्याइतक सोप्प नाहीए तिथलं शिक्षण,अन हाकेच्या अंतरावर उपलब्ध असणार्या डॉक्टरकड़े जाऊन बी.पी. चेक करता येइल इतकंही “आरोग्य” जवळच नाही तिथे.
आम्ही ज्या शाळेत चाललेलो ती ‘सुमिता’ गावातली शाळा...१०-११ की.मी.चे अंतर. तसं या आधी आलेले तेव्हा कुही गावापर्यंत ७-८की.मी. पायी जाण्याचा अनुभव गाठीशी होता त्यामुळे बाइकने काम हलकेच केले असे वाटले होते. पण हा भ्रम काहीच वेळात मोडला गेला...तो हा की बाइक वर जाणे म्हणजे प्रवास सुसह्य होणे! THANKS TO, (‘WHOM SO EVER IT MAY CONCERN)’- रस्त्यांची दयनीय अवस्था!...एकादातर मी चक्क हसलेच,जेव्हा काही अंतर गेल्यावर एका खोदून सपाट केलेल्या जमिनीच्या भागाकडे निर्देश करून मधू भाऊ म्हणाले “हा रास्ता अमुक अमुक साली बनवला गेला...आणि मग या बाजूंच्या गावांकडे जाणं सोप्प झालं...” मधुभाऊंच्या बोलण्यात तथ्य असल तरी, मी इतकच म्हणू शकले की “अच्छा ‘इथे’ 'याला' ‘रस्ता’ म्हणायचं तर?” अर्थात जे आहे त्याची उपयुक्तता लक्षात येउन वाटल, ‘हेही नसे थोडके!’.
इतक्यात “सुमिताला जाताजाता इथल्या phcपण जाऊया,काम आहे.” भाऊ म्हणाले. मनात म्हंटल ‘पर्वणीच!’  कुपोषणासाठी ज्ञात असलेल्या भागातला सरकारी दवाखाना पहायला मिळेल,बरच झाल.भाऊंनी ‘इथे’ म्हणून जे अंतर सांगीतल ते होत ४किमी. चांगल्या रस्त्याच्या आणि कोणत्याही सार्वजनिक परिवहन सेवेशिवाय चे हे दुर्गम भागातील दवाखान्यापर्यंतचे अंतर गरोदर स्त्रिया अथवा कोणताही अतीव आजारी रुग्ण यांच्या साठी जीवघेणेच ठरते यात नवल नाही... phc अत्यंत सुसज्ज (वाटले तरी!). सर्व योजनांचे तक्ते बनवुन भिंतींवर लावलेले. मराठीतून. आमच्या तिथल्या पोरांना मराठी शिकताना येणार्या अडचणी आठवल्या... आमची तिथली पोरं - मातृभाषा कोरकू-बाजरहाट सारा हिंदीतून - आणि शाळेत मराठी! अश्या भाषिक गोंधळात वाढणारी! अन मग त्या सार्या तक्त्यांची उपयुक्ताताच कळेनाशी झाली. कदाचित इंस्पेक्शनसाठीची तयारी असेल ती. मधुभाऊंना तिथले डॉक्टर ओलाखतच होते.
चिलाटी गाव,आपल मेळघाट मित्र च्या ऑफिसच कॅंपस हा सारा परिसर तर आधीच मनात घर करणारा...त्यात सकाळी-सकाळी बाहेर पडून २-3 गावे पार करुन कामाच्या ठिकाणी पोहोचायचंय याविचारानेच मनाला हुरूप आलेला... तिथपर्यंत जाणारे रस्ते ओळखीचे नव्हतेच,पण तिथे गेल्यापासून एकच जाणवत होतं की कोणाची कोणाला ओळख असण्याची गरज तिथल्या व्यवस्थेला लागतच नाही. एक ‘रामराम’ ठोकला की पुढच सार सुकर होत...अर्थात ते ‘आता’. आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला तिथे केवळ अर्धा-एक दिवस जरी झाला असला तरी ज्या ‘मेळघाट मित्र’ च्या नावाने आपण तिथे वावरतो त्याला बरीच पार्श्वभूमी आहे. आज तिथे जाणार्या स्वयंसेवक/सेविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जी १०० एक ब्लँकेट्स ऑफिसमध्ये आहेत ती सुरवातीपासून तर तिथे नक्कीच नव्हती, गरम पाण्याचा बंब तरी कधी आणला काय माहीत? आणि ऑफिसचं पक्क बांधकाम? सुरवातीला एक झोपडीत काम सुरु झालं होतं म्हणतात... “आम्हालाच काय तर पँट मध्ये कोणीही दिसला तरी कोरकू जंगलात पळून जात. ” अस एकदा राम भाऊंनी सांगितल्याच आठवलं,म्हणून मी मधुभाऊंना विचारलं, “तुम्ही नक्की इथे का अन कसे आलात?” पुढे भाऊंनी जे सांगितलं तो सारा 'मेळघाट मित्र' चा आजवरचा इतिहास तर होताच,पण त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या जडणघडणीचाही तो प्रवास होता.
सन १९९८ साली MSW झालेले श्री. मधू माने सांगत होते; समाजकार्यात काम करायचं हे ठरवून पदवी घेतली. कामाच्या शोधात असताना ‘मैत्रीच्या’ विनिताताईंशी त्यांचा परिचय झाला. तेव्हा मेळघाटातला कुपोषणाचा प्रश्न अगदीच ज्वलंत झाला होता. अन्य नोकऱ्यांची प्रलोभनं टाळून त्यांनी मेळघाटात काम करायचं हे निश्चित केलं. रामभाऊ तिथे काम करतच होते. पुढे मधूभाऊ तिथे गेले. एकाचे दोन दोनाचे चार होत होत आजची तिथली राजाभाऊ, कालुभैय्या, दिलीपभैय्या, रमेश भाऊ बसंती दीदी तसेच अनेक गावमित्र आणि आरोग्यामैत्रिणी इत्यादींची टीम बनत गेली. घडत गेली.
कविता महाजनांच ब्र वाचलेल त्याला आता बरीच वर्ष झाली,पण तेव्हापासून जे “सेवाभावी संस्था = प्रमाणिकपणा” या समिकरणावर प्रश्नचिन्ह उठल ते कायमचच. पण मैत्रीची मला विशेष भावते ती गोष्ट म्हणजे स्थानिक नेतृत्व तयार करण्यावर असणारा त्यांचा भर... मधुभाऊंच सार ऐकल्यावर हे अस सगळ मनात चालू असताना...अचानक गाडीचा ब्रेक दाबून भाउन्नी हाक दिली... “पिन्नु!!!!!!”... “कैसा चल रहा है???... अब तो तू सरपंच बन गयी...”भाऊंनी त्या दीदीन्ची विचारपूस केली...अन त्यांनीही भाऊंची... “सुमिता जाके आताहू...” म्हणत भाऊंनी त्यांचा निरोप घेतला...ह्या 'पिन्नु' म्हणजे सुरवातीच्या काळातील आपल्या 'आरोग्यमैत्रीण'. त्यांचा एक किस्साही भाऊंनी सांगितला. असंच एकदा मेळघाटातल्या आपल्या आरोग्यमैत्रिणींना पुण्यात प्रशिक्षणासाठी नेलं होतं. फावल्यावेळात त्यांना शहरात फेरफटका मारायला नेलं असताना उंचचउंच इमारती पाहून पिन्नूदीदींनी विचारलं होतं, "हे सारं कोणी बांधलं? या खोल्या एकावर एक कोणी ठेवल्या? माणसालातरी हे शक्य नाही!" इतकं सिमित विश्व असणाऱ्या पिन्नू दीदी आज इतक्यावर्षांनंतर सरपंच झालेल्या आहेत. हा काही साधसुधा प्रवास नक्कीच नसणार. पिन्नू आपल्या सगळयांना परिचयाची होण्याइतकी ‘FAMOUS’ नसेल झाली पण आपल्या गावाची काम करण्याइतकी सक्षम नक्कीच झालीए याविषयीच समाधान इथल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. “लोग मिलते गए और कारवां बनता गया”... या प्रवाहातला पिन्नू दीदी  हा एक टप्पा होता. तसाच एक तोताराम. आम्ही ज्या गावात जात होतो त्या सुमितामधला आपला पहिला 'बोकोमित्र' (बोको म्हणजे कोरकूत मुले/बाल्य). बोकोमित्र ते ग्रामपंचायत सदस्य असा त्यांचा प्रवास. योगायोग असा की आम्ही सुमितातल्या शाळेजवळ पोहोचायला आणि तोताराम भाऊंची गाठ पडायला! त्यांच्याविषयी इतक ऐकल्यानंतर त्यांना भेटून खुपच आनंद झाला. “हा तोताराम,हाच तो ज्याने हे अस इतक अमुक तमुक केल...ही प्राजक्ता, ही अस-तस करते...” अस काहीस मधुभाऊ सांगतील आमची 'औपचारिक' ओळख करून देतील अस वाटलं होतं,पण सुदैवाने तस काहीच न करता त्यांनी माझीच एका वाक्यातली ओळख त्याना दिली, “स्कूल के काम के लिए आई हैं ये दीदी पुनेसे.” आम्ही दोघांनीही एकमेकांना रामराम ठोकला. भाऊंनी शाळा दाखवली, आपले तिथले गावमित्र सोमजीभाऊ तिथे होतेच. तोपर्यंत गावातल्या इतर कामांच्या पाहणीसाठी तोतारामढाईंसोबत गेले.(तेथे भाऊ या अर्थी 'ढ़ाई' असे संबोधतात)
सोमजीभाऊंसारखे अजून १0 गावामित्र १० गावांमधे आहेत. आपले बरेच गावमित्र हे स्वतः कोरकू असून आतासारख्याच नावाला चालणाऱ्या तिथल्या शाळांमधून शिकलेले. 'कृतीयुक्त शिक्षण' हे त्यांनाही नवीनच. तरी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न पाहून सुखावतो आपण. आज पुण्या-मुंबईहून बोलवावं लागणारं मनुष्यबळ भविष्यात लागू नये यासाठीचा हा दूरदर्शी कार्यक्रम! मी शाळेत गेले तेव्हा सोमजी भाऊंचा वर्ग चालूच होता. या आधीच्या स्वयंसेवकांनी दिलेल्या प्रशिक्षणानुसार त्यांचं शिकवून झाल्यावर त्यांच्या वर्गाला मी जवळ केलं. ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमातील काही भाग नमूना म्हणून शिकवला. 'वर्ग नियंत्रणाला' पर्यायी पद्धत म्हणजे 'मुलांना गुंतवून ठेवण्याची कला' त्यांना कळेल अश्या activities घेतल्या मुला-मुलींच्या. वर्ग सोडताना मोठ्ठा 'बाय- बाsssय' चा कार्यक्रम झाला. पुन्हा थोडं सोमजी भाऊंशी अभ्याससाहित्य वापराविषयी बोलले,मग तोतारामढाई आणि मधू भाऊ बोलत होते तिथे गेले.
निघालो तेव्हा १२, १२.३० वाजलेले....चिलाटीच्या ऑफिसमध्ये आरोग्य मैत्रिणींना प्रशिक्षणासाठी मधुभाऊंनी बोलावल होत,त्या वाट पाहत असतील या विचारासहच आम्ही तुलसी,वैशाली,सोमजीढाई,तोतारामढाईंचा निरोप घेतला. “भाऊ NRHM ची आशा आणि आपल्या आरोग्य मैत्रिणी यांच्यात काय फरक आहे?” आरोग्य मैत्रिणींचा विचार मनात घोळतच होता,म्हंटल विचारूनच घेऊ. “खरतर काहीच नाही.”- मधुभाऊ. “मग आपल्या आरोग्य मैत्रिणी आणि आशा एकाच दीदीला केल तर मदत नाही का होणार?” माझी शंका. कदाचित पुढे मधुभाऊंचा पूर्वानुभव बोलला असावा. मधुभाऊ म्हणाले, “आशा या पुन्हा सरकारी कामाच्या चाकोरित अडकतात,त्यामुळे आरोग्य मैत्रिणीच्या कामातली स्वायत्तता हरवण्याची भीती असते.” येतानाच आम्ही हातरुच्या PHCत जाऊन आलेलो तेव्हाचा प्रसंग आठवला. मैत्रीच्या पावसाळयातल्या ‘धड़क मोहिमें’दरम्यान एकही बालमृत्यु होऊ दिला नव्हता या सार्यानी...आणि phc तल्या डॉक्टरशी बोलल्यावर कळाल की गेल्या महिन्यात बरेच बालमृत्यु झाले!!! त्याच कारण देत डॉ.साहेब म्हणाले की “आम्ही तरी काय करणार? पालक येतच नाहीत मुलांना घेउन दवाखान्यात.”. सेवा 'पुरवणं’ आणि ‘सेवा करणं’ यात अंधुकसा फरक आहे,तो लक्षात यायला हवा आपल्याला हे पुन्हा एकदा नव्याने जाणवलं.
 मेळघाटातले निसर्गसौंदर्य हे अवर्णनीयच! अर्थात ते  फक्त आपल्यासाठीच. तो निसर्ग आणि तिथले गावकरी (आदिवासी) हे इतके एकरूप झालेले असतात की त्यांची नजर खिळुन वगैरे राहत नाही आपल्या शहरी लोकांसारखी. हा पण म्हणून त्यांना त्याची किंमत नाही असेही नाही. असाच एका स्वयंसेवकाला आलेला अनुभव. शाळेतल्या काही विद्यार्थ्यांसोबत रानातून जाताना जांभूळाच झाड लागलं. एक लहान मुलगा झाडावर चढला. स्वयंसेवकाला त्याने विचारल किती जांभळे काढू? स्वयंसेवक “काढ ४,५.”
“४ या ५??? कितना खाएगा वो बता,उतनाही निकालूँगा.” मुलाच उत्तर. हा प्रसंग एकीकडे आणि शहरात बसून अमाप विज,पाणी,इ. संसाधने वाया घालवत “SUSTAINABLE DEVELOPMENT” वर चर्चा झाडणारे आपण. कोण मागास आणि कोणाला पुढारलेले म्हणायाचे? उत्तर सोप्पय.
       चिलाटीत परतेपर्यंत आधी न पाहिलेल न अनुभवलेल मेळघाट अनुभवायला मिळालं. पहिल्या वर्षी गेले तेव्हा पूर्ण वेळ मुलांमध्ये कैंपस वरच जायचा. तेव्हा त्यांना शिकावताशिकवता मी खुप शिकले. नंतरच्या वेळी गेले तेव्हा शाळा-शिक्षक-शिक्षण-आणि पोरं यामध्ये रमले. यावेळी मात्र विविधांगी अनुभव घेता आला. एखादी योजना मग ती शिक्षणाची असो वा आणखी कोणती त्याचा एकांगी विचार करुन उपयोग नाही हे याची देहि अनुभवले. त्यांना म्हणजे आदिवासींना आपण फ़क्त अक्षरओळख देऊ शकतो,पण जीवनाची कितीतरी मुल्ये त्यांनी अजूनही टिकवून ठेवलीएत त्यांच्याही नकळत,ती शिकायला मात्र आपण तिथे जायलाच हवं. भाऊंनी एकदा विचारलं होतं मला, की ‘मला मेळघाटाने काय दिलं?’ काहीतरीच थातुरमातुर उत्तरं दिली मी तेव्हा, असं आता वाटू लागलं होत. दुपारची उन्हं चढली होती. पण तरी कैंपस मध्ये पोहचता पोहचता मला समृध्द करणार्या या आणि अश्या कित्येक अनुभवांनी मला मी सापडत गेले होते,याची जाणीव झाली आणि मनातच गारवा वाटू लागला.
फूलमा, बिसाय, सुनीता, मंगराई आणि इतर आरोग्यमैत्रिणी आल्याच होत्या,त्यांच्याशी गप्पा मारत भाऊ पुढच्या प्रशिक्षनाच्या तयारीला लागलेही होते. सरकारी ९-५च वेळापत्रकीय पध्दतीच कामकाज अजुन तरी इथे पोचल नाहीए,ते बरंच. बरीच काम ही गप्पा मारत अनौपचारिक पध्दतीनेच पार पडतात हे मनाला जास्तच भावत. आणि त्यामुळेच इथल्या कमाने शरीर,मन थकलेले आठवतच नाही कधी.
-प्राजक्ता. 

Sunday 25 October 2015

"एकटीने" ...

एकटीने दुरचा प्रवास करणं, नाटक सिनेमाला जाण, रेस्तरॉमधे जाऊन हव्या त्या पदार्थांचा फडशा पाडणं, फार कशाला जवळच्या टपरीवर जाऊन एक स्पेशल मारणं...कोशातून बाहेर आणतात आपल्याला. 'सोबती'च्या 'सुरक्षा कवचा'तून बाहेर काढतात. आपल्याला वाटत सोबतीची सवय मोडली की जमेल अस एकटं राहण. एकटं पडण आणि एकटं राहण पसंत करणं यांतला फरक आत्मसात करायलाही वेळ लागतो खरतर. पण एकटीने हवं ते करायला सुरुवात केल्याशिवाय सोबतीची सवय...किंवा गरज मोडत नसते.

नुकताच एकटीने नाटक पाहण्याचा अनुभव घेतला आणि जाणवलं ; ITS NOT A BIG DEAL! खरंच इतकी काही मोठी गोष्ट नाहीए ती. सुरुवात कटिंग पासून झाली होती, म्हणजे आपल्याला असणारी चहाची गरज आणि इतरांची गरज याचा ताळमेळ साधत बसण्याची अनाठायी कसरत नकोशी झाली आणि अनावधानानेच सोबतीपेक्षा चहा महत्वाचा झाला. पुढे प्रवास केला आणि मग जाणवलं सोबतींमध्ये रमण्यापेक्षाही इतर बऱ्याच गोष्टी असतात अनुभवण्यासारख्या. भीती वाटते कधीतरी, मग ‘धाडस’ वगैरे सारखं काहीतरी दाखवून निभावून नेतो आपण. आणि मग तो एक मापदंड बनतो. कुठल्या पातळीपर्यंत आपली धाडस-क्षमता गेली आहे याचा.

कधी रस्त्यावरच्या भांडणात पडतो आपण; तेव्हा तिर्हाइत पुरुषाने “बरं झालं तू मधे पडलीस, कसंयना लेडिजचा matter (नवरा-बायकोच भांडण ज्यात नवरा त्या बाईला मारतोय हा matter!) असला की आम्ही (पुरुष) मध्ये पडलो तर बर नाय दिसत” असं म्हणेपर्यंत आपल्यालाही कळत नाही की बाह्यदर्शी आपण समाजाच्या ‘स्त्री’ संकल्पनेच्या अपेक्षित धाडस-क्षमतेहून जास्त काही केले आहे. एकटं राहील की खरं कळत आपल्यातल्या आत्मविश्वासाची मुळं कुठंवर खोल गेली आहेत.

सुरुवातीला हे सारं नेणिवेतून जाणीवेत येइपर्यंत आपण काही विशेष करतोय हे लक्षात येत नाही. मग पुढे इतरांच्या नजरांमधून कधी काळजी, कधी हेवा, कधी आश्चर्य, कधी दया (की बापरे! बिचारी....एकटी) हे आपल्याला दिसू लागतं. बाकी सारं आपल्याला हसण्यावारी नेता आलं तरी लोकांना आपला हेवा वाटतो हे पाहून कधी आपला अहम सुखावतो. 'ग ची बाधा' होऊ लागते. आपल्याला कोणाची गरज नाही असंही कधी वाटू शकतं. अर्थातच Aristotle ने जे ‘MAN’ विषयी मांडलं ते खरंतर सर्व HUMANS ला लागू आहे. Womenसुद्धा सामाजिक प्राणीच असतात ना.

आपण सारे अशी बेटे आहोत जी वरवर पाहता विभक्त दिसतात पण पाण्याखाली सर्व एकमेकांशी सलंग्नच असतात. त्यामुळे इतरांची गरज नाही ही धारणा फार काळ टिकत नाही. 'ग ची बाधा' गेली हे कसं समजावं? तर एरवी एकटे जाण्यास तयार असणारे आपण खरंच कंटाळा आला / एकटे वाटत असेल / किंवा उगाचच सोबत हवी वाटत असेल तेव्हा विनासायास जवळच्या व्यक्तींना ‘सोबत येणार का?’ अशी विचारणा करू शकतो. शिवाय समोरच्या व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्यही देतो.

एकटं राहणं पसंतीस पडू लागलं म्हणजे ‘अगदी माणूसघाणी झाली ही तर’ असं म्हणणं किती बाळबोध होईल हे तर सांगायला नकोच. तरी स्वातंत्र्याची खरी चव चाखायाची तर सर्वच मानसिक बेड्या तोडायला हव्यात हे याच एकटं राहण्यातून कळतं. यामुळे निव्वळ आपलंच स्वातंत्र्य टिकतं असं नाही,तर एरवी फक्त आपल्याला हवं म्हणून समोरच्या व्यक्तीने तिचा वेळ आपल्याला देण्याची जी नकळत सक्ति आपण त्यांच्यावर करतो त्यापासून त्यांचीही मुक्तता होते.

आपल्यावरच्या प्रेमापोटी ते येतात सोबत किंवा आपण देतो त्यांना सोबत वगैरे युक्तिवाद हे प्रेमाची अजून अद्याक्षरे गिरावणार्यांचे युक्तिवाद वाटतात. आपली खरी सोबत करणारी माणसे आपल्याला कधीच अधू बनवत नाहीत.आपल्याला त्यांच्यावर किंवा इतरांवर अवलंबून रहावं लागेल अशी मानसिकता तयार होऊ देत नाहीत.खरी सोबत किंवा प्रेम करणारी माणसं ही आपल्याही नकळत आपल्याला आपल्या स्वतःसोबत जगायला शिकवतात.जगाने पाठ फिरवली म्हणून ‘एकला चलो रे’चा झेंडा हाती घेण्याची वेळ येते काहींवर;पण सुदैवाने तशी वेळ आली नसली तरी एखादा प्रयोग म्हणून 'आपण' स्त्रियांनी तसेच मुलींनी अश्या ‘एकटी’च्या सफरीचा अनुभव घ्यायलाच हवा.


ता.क़.- इथे इतकं स्त्री-विशिष्ट बोलण्यास कारण की पुरुषांना व मुलांना ही संधी बाहेरून सहज मिळते. त्याचा लाभ घेणं जितके पुरुषांना सुकर आहे तितके स्त्रियांना नाही. उदाहरणार्थ-सुरक्षिततेचा मुद्दा.
-प्राजक्ता.

"एक मुक्त....ती"


हरवली आहे,
एक कविता...
तश्या ठेवणीतल्या
बऱ्याच कविता
तुझ्यापासून लपवल्या,
तू वाचण्याआधीच खोडल्या,
काहींचा गळा गर्भातच घोटला,
तर काही
कळ्या होताहोता खुडल्या...
हीच जाणं तसं
अकाली
अनपेक्षित !
अजून ती ओठांवर खेळायची होती
रक्तात भिनायची हाडात शिरायची होती...
उरली आता
गाफिल 'मी'च्या आठवणीतली
एक मुक्त....ती.
-प्राजक्ता