Sunday 6 November 2016

त्या_आशयाभोवती...

लिहायला घेते मनातल्या मनात बऱ्याचदा.

कधी समोरच्या भेदरलेल्या नजरांमध्ये हरवून जातात वाक्ये, तर कित्येकदा निश्वासांसोबत बऱ्याच गोष्टी सुटून जातात .
बऱ्याच गोष्टी करायच्या असूनसुद्धा हातून काही होत नसते आणि सतत व्यस्त असूनही मागे वळून पाहिलं की डोंगर सोडा स्वकर्तृत्वाची एखादी टेकडीही दिसत नाही.
सालं साधं टोकाचं निराशावादीही होता येत नसतं, मग असलं तसलं,काही बाही, छूटूक मुटूक करत राहायचं.
झिजत राहायचं चंदनही न होता.

आत्मभान, साक्षात्कार अशा शब्दांच्या भेंड्या खेळत राहायचं स्वतःशीच! राज्य आपल्यावरंच; आपणच दिलेलं. पकडायचं आपणच - आपल्यालाच! अचंबा वाटावं असं सारं काही असताना कशाचंच काहीच वाटू न देता
रडीचा डाव खेळत राहायचं न जिंकता.
लिहिण्यापूर्वीच शब्दांची निरार्थकता कळत जाताना डिलिट होत राहतात अनेक शब्द पण बोलण्यापूर्वीची त्यांच्यातल्या अनेकांची निरार्थकता का कळू नये हा प्रश्न पडत राहातो...नको तेव्हा! मग लिहिणं टळत असताना कधी बोलणं टळत राहतं आपलं आपणच. मुके होत नसलो आपण तरी सोयीची मौनं घेरतात आपल्याला. त्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या तीव्र शांततेत वावरणारे आपण बहिरे होतो...आंधळेही... आणि अधूही.
गाळणी बसते, चाळत राहते. छळत राहते.
निषेध करतो. त्रिवार करतो. हॅशटॅगतो. बघतो. सवयीचे होतो. बोथटतो. जगतो...मरत मरत.

लिहायला घेते मनातल्या मनात असं बरंच काही. पण बऱ्याचदा भेटत राहतात माणसं. माणसांची बनलेली. मग शब्दांच्या माणसी रचनेला महत्व उरत नाही. घुसमटतात मग ही माणसाळलेली अक्षरे आणि हे शब्द जे भाषांच्या मर्यादेत अडकत राहतात. ज्यांच्या अर्थातल्या संकल्पनांना एकवेळ नसेल मर्यादा पण उच्चाराला अर्थ लगडतो एखाद्या सीमित भाषाविश्वाचा. मग ते मराठी होतं, इंग्लिश ,कन्नडा, तेलगू किंवा हिंग्लिश होतं. त्यांच्या शुद्धाशुद्धतेच्या कसोट्या लागतात डोकं वर काढायला. ती छाटणारेही असतात आजूबाजूला...
कधी सशस्त्र कधी निशस्त्र.
कधी बोलघेवडे,कधी न बोलून शहाणे.

लिहिणं जगणं असतं काहींचं.
काहींचं जगणं लिहिण्यात उतरतं.
बंद मुठीत वाळू घ्यावी, मग ती निसटून जावी त्या बंदिस्ततेतून. हाताला चिकटलेली वाळू तेवढी खुण असते त्या अनुभवाची. तसंच होतं.
लिहायला घेते मनातल्या मनात बऱ्याचदा पण हाताशी तेच राहतं जे अनायसे राहिलं हाताशी.
जे हवं हवं म्हणून ध्यास धरला ते त्याच हव्यासापोटी निसटून जात राहतं. त्याच्या सुटकेचा क्षण दिसत राहतो पण पकडता येत नाही... वाळूला हातात, 'त्या'साऱ्याला शब्दांत.

लिहायला घेते मी मनातल्या मनात बऱ्याचदा...
भरकटत राहतं मग असं इतर सगळंच;
#त्या_आशयाभोवती.



-प्राजक्ता.

Friday 30 September 2016

Independent लडकी....पिंकच्या निमित्ताने!

"Independent लडकी लडकों को confuse कर देती है।"
वाक्य अर्थातच सध्या चर्चेत असणाऱ्या चित्रपटातलं. #PINK मधलं.
चित्रपट पाहिल्यापासून वाक्य डोक्यात घुमतंय.
मागच्या पिढीचा अनुभव काय असेल सांगता येणार नाही, मात्र हे वाक्य माझ्या पिढीतल्या अनेक मुलामुलींना/ स्त्री पुरुषांना लागू आहे. 
हे वाक्य जर-
Independent लडकी को देख के [dependent] लडके confuse हो जाते है। असं असतं तर आणखी आवडलं असतं. असो.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात...
-ज्यांना निव्वळ 'घराला घरपण' देणारी बायको हवी असते. अर्थात या घरपणात भावनिक आधार किंवा मानसिक शांती हा फार खचितच मुद्दा येतो.
यांच्या लेखी घरपण म्हणजे-
कामावरून आल्यावर 'ती' स्वतः कामाला जात असली आणि दमली वगैरे असली,तरी नवऱ्यावरचं 'प्रेम(?)' दाखवण्यासाठी पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देते.
चार चौघात का होईना 'अहो' म्हणते.
'यांना विचारून सांगते'ची जागा हल्ली 'याच्याशी बोलून कळवते' ने घेतलेली असते. अर्थात यातही काही गैर नाही...जर हे एकमेकांशी सल्लामसलत करणं अन्योन्य (रेसिप्रोकल) असलं तर...आणि तरंच!

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात-
जे अभिमानाने सांगतात मला माझी आई/ताई/आजी/आत्या/मामी/काकी/ घरातली कोणतीही स्त्री साधं माझं जेवणाचं ताटही उचलू देत नाहीत. आमच्यात तशी पद्धतच नाही.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात- जे गरम पाण्याच्या बादलीमध्ये उभी राहून चपात्या करणाऱ्या आपल्या आईचा फोटो फेसबुकवर अपलोड करतात हे म्हणत - कि बघा खऱ्या आईचं प्रेम!! इतकं आजारी असून, पाय दुखत असूनपण,मुलाला गरम चपात्या खायला मिळाव्यात म्हणून माझी आई अशा परिस्थितीत पण चपात्या करते आहे!!!
हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात ज्यांना एरवी सोडा पण आई आजारी असतानाही साधी स्वतःची जेवणाची सोय करता येत नाही.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात ज्यांना वाटतं की ते पैसे कमवतात त्यामुळे ते स्वतंत्रवृत्तीचे आहेत पण आधी आई - मग बायको - मग सुनेवर  जेवण-खाणं-आंघोळीला जाताना टॉवेल देण्यापासून ते घरातला केर काढण्यापर्यंत डीपेंड राहत स्वतःची उष्टी स्वतंत्रता मिरवत राहतात.
आणि त्याउपर-
स्त्री जन्म हा आधी पिता - मग बंधू -आणि मग पुत्रावर विसंबून असतो अशा भाकडकथाही पसरवत राहतात.
व्यक्तिगत आयुष्यात पित्याच्या आणि बंधुच्या प्रचंड आधाराचा मला अनुभव आहे, पण त्या आधाराच्या कधी बेडया झाल्या नाहीत...तरीही हे असं बेगडी आधाराच्या नावावर राणीच्या बागेतल्या प्राण्यासारखं बाईला बंदिस्त करून ठेवलं जातं हा सार्वत्रिक अनुभव मला नाकारता येत नाही.

तथाकथित इंडिपेंडंट आयुष्य जगणाऱ्या पुरुषाला बाईच्या स्वातंत्र्याविषयी भूमिका घेताना राजदूतांच्या तोडीस तोड असं डिप्लोमॅटिक होताना पाहिलं आहे...
मग यात अनेक तर्क-वितर्क मांडले जातात-
>कुटुंबाचं स्थैर्य महत्वाचं
>बाहेर वातावरण कसलं आहे तुला जाणीव नाहीए
>गरजंच काय आहे?
>मुलांवर चांगले संस्कार व्हायचे असतील तर आईच लागते!
>एखाद-दुसऱ्या टक्के पोरींवर रेप होतात, तुम्ही काय त्याचा एवढा issue करता कळत नाही!

यादी तुम्हालाही वाढवता येऊ शकते.

मुद्दा हा आहे की पिंक मधलं हे वाक्य-
"Independent लडकी लडकों को confuse कर देती है।" चित्रपटातील संदर्भाच्यापलीकडेही लागू होतं.

Confuse होऊन तुमच्यातला पुरुष चित्रपटात दाखवल्याप्रमाणे शारीरिक बलात्कार करेलच असे नाही. पण या अशा पुरुषांच्या confuse मानसिकतेने अनेकींवर मानसिक जोरजबरदस्ती केलेली असते याची जाणीवही या कान्फ्युज्यांना नसते किंवा सोयीने ती दडपली जात असते.

स्वतः कमवणाऱ्या, स्वतःचे निर्णय घेणाऱ्या, एकट्या राहणाऱ्या, एकट्या हिंडणाऱ्या/फिरणाऱ्या किंवा स्वतःच्या निवडीनुसार माणसांची संगत करणाऱ्या अनेक स्वतंत्रवृत्तीच्या स्त्रियांची लग्न होताना किंवा झाल्यावर या स्वातंत्र्याविषयी अनेक तडजोडी कराव्या लागणाऱ्या स्त्रिया पाहिल्या आहेत. 

तेव्हा हाच विचार येतो.
'मुलीला स्वतंत्र बनायला इतकं सारं करावं लागतं.
मुलगा फक्त कमवता झाला की स्वतंत्र होतो.'
ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमचे अनेक १५ ऑगस्ट येतील नि जातील पण त्यात आम्ही झेंडा हा फक्त प्रतीक म्हणूनच फडकवत असू हे लक्षात असू द्या. चित्रपटात हे सगळं कुठे आहे विचाराल नाही का? चित्रपटाने यातलं काहीच थेट म्हंटलेलं नाही. पण चित्रपटातील समाज हा याच डिपेंडेन्ट आणि तरीही स्वतःला सत्ता स्थानी मानणाऱ्या  पुरुषसत्ताक मानसिकतेचा बनलेला आहे. जो अधोरेखित केला नसला तरी ...तो आहे. 

नाही. नकार. हे संपूर्ण वाक्य आहे हे समजण्यासाठी 2016 मध्ये एक अक्खा चित्रपट बनवावा लागतो. तो लोकांच्या गळी उतरावा म्हणून हिंदी चित्रपटांच्या शहेनशहाची त्यात भूमिका असावी लागते, आपल्या समाजासाठी यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही. 'मॅरिटल रेप्सना आपल्या सांस्कृतिक विश्वात जागा नाही'(!!!) असे विधान एक महिला मंत्री करतात तेव्हा समानुभूती(emapthy) या शब्दवरचा विश्वास उडून जातो.  मुळात बलात्कार हा निव्वळ पुरुषसत्ताक मानसिकतेचा परिपाक आहे हेच मानायला आपण अजून तयार नाही. आपल्यातल्या अजून कित्येकांना वाटतं की महिला, मुली, लहान बाळं ,वृद्ध स्त्रिया यांच्या कपड्यांमुळे किंवा त्यांच्या एकूण वागण्या बोलण्यातल्या 'हिंट्स' मुळेच बलात्कार होतात. या हिंट्स वरही चित्रपटात भाष्य केलेच आहे. Men will be Men, लडके है लडको जैसेही बरताव करेंगे अशी निलाजरी वक्तव्य आपण करत जातो. तथाकथित अपुऱ्या कपड्यांमुळे बाई पुरुषाचे लक्ष वेधून घेते आणि बलात्काराला स्वतःहून आमंत्रण देते असे म्हणणाऱ्यांना मला विचारावे वाटते की आजूबाजूला पहा, अनेक उघडे पुरुष पाहायला मिळतील, भर रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला लघवी करत उभे राहिलेले दिसतील, रस्त्यात कपडे बदलताना दिसतील, इतकंच काय एकट्या बाईकडे बघून दिवसा ढवळ्या मास्टूरबेट करताना दिसतील...या सगळ्यांवर स्त्रियांकडून शारीरिक अथवा मानसिक जोर जबरदस्ती होताना का दिसत नाही??? (टेस्टेस्टेरॉन सारखी पाचकळ उत्तरे देऊ नका. नाहीतर कधीच उल्लेख न केल्या जाणाऱ्या महिलांच्या orgasm विषयी चर्चेला तुम्हाला मी भाग पाडेन.)आणि पुढे हा विचार करा की  विधवा स्त्रीला कुरूप करण्याचा घाट का घातला जात असावा? सतीच्या मागे खरंच किती काळजी होती? आणि जगप्रसिद्ध प्रश्न एका परिटाच्या सांगण्यावरून रामाने सीतेची चारित्र्य परीक्षा घेतलीच ना? हे सगळं स्त्रीला असणारं लैंगिक स्वातंत्र्याला नाकारणं आहे.
इंडिपेंडंट मुलींचे Character assassination अर्थात चारित्र्य हनन हा आणखी एक महत्वाचा मुद्दा पिंकने अधोरेखित केला आहे. लोक काय म्हणतील या मानसिकतेचा जाच मुलांना फक्त शिक्षण/जॉब/व्यसन/पालकांची सेवा इत्यादी बाबतच सहन करावा लागतो. मुलींना हे तर सगळं सहन कराव लागतंच पण त्याच बरोबर एखाद्या मित्रासोबत किंवा अनोळखी मुलासोबत सोसायटी बाहेर/ बिल्डिंग खाली, घराच्या आत किंवा बाहेर/ फेसबुक वरील ओपन प्लॅटफॉर्म्स वर किंवा व्हाट्सअप ग्रुपवरही कुठेही नुसतं मनमोकळं बोलताना याचा विचार करत बोलावं लागत कि लोक काय म्हणतील? किंवा मी नुसत्या मैत्रीच्या नात्याने बोलते आहे हे समोरच्या व्यक्तीला नाही समजलं तर? तर मग काय? त्यापेक्षा जाऊदे. अस म्हणत बऱ्याच जणी मोकळंढाकळं वागणं टाळतात. आणि मग आपण बोलत राहतो ती बुजरी आहे, पोरींना चारचौघात आत्मविश्वासाने बोलता येत नाही.
माशाला पाण्याबाहेर ठेवायच आणि म्हणायचं कि अरे हे तर पोहोतच नाही,अशातली ही गत.

चित्रपटाच्या यशा नंतर आणखी एक मतप्रवाह डोकं वर काढू लागला तो म्हणजे हा कि -बघा
काहीही झालं तरी शेवटी एक पुरुषच आला ना अबला स्त्रियांच्या संरक्षणा साठी!!! आता यावर अनेक स्त्रीवाद्यांचेही म्हणणे आहे की त्याऐवजी एक स्त्री पात्र असते तर जास्त प्रभावी संदेश गेला असता. परंतु माझं व्यक्तिगत मत असे आहे की त्या ठिकाणी एखादी स्त्री आहे अथवा पुरुष हा मुद्दाच गौण व्हावा अशा समाजाची स्वप्न आपल्याला पडायला हवीत. मुळात लढा हा पुरुषसत्ताक मानसिकतेविरोधात आहे, आणि तो मातृसत्ता स्थापन करण्यासाठीचा नाही. हे लक्षात घेतलं कि खरा स्त्रीवाद कळतो. सत्ता ही कोणाचीच नसावी. प्रत्येक व्यक्ती समान पातळीवर असावी.  मग नुसता मानवतावाद का नको? स्त्रीवादाचा हट्ट का? तर साधी गोष्ट लक्षात घेऊया कि मानवतावादाला नकार नाही. तो असण्यास काही कारण नाही. पण पंचवार्षिक योजना बघा आधी Growth वर केंद्रित होत्या,मग पुढे Inclusive Growth वर आधारित झाल्या? अस का झालं? कारण आधीची वाढ ही सर्वसमावेशक नव्हती. ती सर्वसमावेशक व्हावी यासाठी दुबळ्या असणाऱ्या किंवा दुबळ्या ठेवल्या गेलेल्या घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना प्रस्थापितांच्या समान पातळीवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. तसेच हे. पुरुषसत्ताक मानसिकता ही निव्वळ पुरुषांमध्येच असते असे नाही. स्त्रियाही त्याच्या बळी आहेत. सक्षमीकरणाचे कार्यक्रम हे फक्त महिलांचे होता कामा नयेत. आधी कधीही न अनुभवलेली समानता अनुभवण्यासाठी स्त्री पुरुष दोघांनाही एकत्रितरित्या तयार करणे गरजेचे आहे. काहींच्या मते शिकलेल्या/कमावत्या मुलीला घरात लग्न करून आणले कि घरात भांडणं होतात. आता खरंतर ही भांडण होतात कारण आधुनिक विचारांची बायको हवी म्हणून उच्चशिक्षित मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांनाही हे लक्षात येत नाही कि तिची स्वप्नेही तितकी मोठी असणार, आधुनिक शिक्षण घेतलेल्या सुनेकडून त्याच त्या पूर्वापार चालत आलेल्या रांधा वाढा उष्टी काढा परंपरांच्या
अपेक्षा यांना असतात. पण दोष मात्र त्या पिढीतल्या मुलींना. जिथे अजून मानसिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वातंत्र्यही पुरेपूर स्त्रीला उपभोगता येत नाही तिथे तुम्ही लैंगिक स्वातंत्र्याचा उच्चार तरी कसा करणार? त्यामुळेच बाईकडून कोणत्याही प्रकारचा NO हा या समाजाला अपेक्षित नसतो. त्या पार्श्वभूमीवर पिंक महत्वाचा ठरवावा लागेल. हो 'ठरवावा लागेल' . पिंकपेक्षाही अधिक ठळक भाष्य करणारे चित्रपट यापूर्वीही होऊन गेले आहेत पण आपल्या समाजाची आकलनाची पातळी पाहाता अशा बडबडगीतांसारख्या सिनेमाची गरज आहेच. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उत्कृष्ट असला तरी जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर स्त्रीवादी चळवळ आणि लिंगभाव चर्चा (Gender Debate) बरीच पुढे गेली आहे.
पण पिंकच्या निमित्ताने म्हणावे वाटते...
हेही नसे थोडके!


-प्राजक्ता.

Friday 2 September 2016

प्रौ'ढं'!

पेस्ट्री आवडते? ... पेस्ट्रीच्या दुकानात कामही करता?...पण मग तुम्हाला पेस्ट्री खायला मिळते का नेहमी? नाही.
लहान मुलांमध्ये रमता?...लहान मुलांसोबत काम करता?... तर मग तुम्हाला लहान व्हायला मात्र मिळते...नेहमीच.

शाळेत असताना बालदिनाला "मुले ही देवाघरची फुले" "मुले हेच राष्ट्राचे खरे अलंकार!" "मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती" अशा अर्थाच्या घोषणा देत असू पण घाई होती मोठं होण्याची. मोठ्यांच्या चपला घालणं, घर-घर / ऑफिस ऑफिस खेळणं, शाळेतल्या बाई होणं... हे सारं त्याचाच भाग.
मोठं होता होता निबंधांमध्ये "लहानपण देगा देवा..."इत्यादी वाक्ये वापरत असलो तरी वाटत होतं की यात काय खरं नाही. मनासारखं वागायचं तर मोठं व्हावं.
दुसरा पर्याय नाही.
मग मोठं झालं की तर असतंच नॉस्टॅल्जिया प्रकरण.
आजकाल तर फेबूवर पोष्टी पण फिरत असतात फोटोज सकट... If you know this then your childhood was awesome आणि काय ना काय.

खरंतर काळ ही संकल्पना मुंबईच्या लोकलच्या जाळ्यासारखी हवी होती. जेव्हा वाटेल तेव्हा जिथून वाटेल तिथून उठायचं नि दादर/कुर्ला गाठून जिथे ज्या काळात जायचं तिथे सुटायचं!
मग स्टेशनंही बदलत राहतील. त्याच त्याच गाड्या नि तेच तेच प्लॅटफॉर्म असणार नाहीत.
त्याच त्या आठवणी असणार नाहीत.

जे जगालोच नाही ते अनुभवायचं कसं?
अशा बुचकाळ्यात पडताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी- स्वतःच्या बालपणात रमणे आणि बालपणात रमणे यात फरक आहे.
मी घराच्या पोटमाळ्यावरून खेळण्याची टोपली काढणं आणि त्यात रमणं हे माझं बालपण जगणं/स्मरणं झालं.
जवळच्या ओळखीच्या/अनोळखी मुलांमध्ये रमणं हे 'निव्वळ बालपण' जगणं झालं.
ते जास्त मन मोहणारे आहे असाच आत्तापर्यंतचा अनुभव आहे.

लहानग्यांशी बोलण्यापेक्षा त्यांचं जितकं ऐकत जाऊ आपण तितकी अनेक वेगवेगळी लहानपणं जगत जातो आपण. अनुभवत जातो.
बालपणं स्थळ काळ सापेक्ष तर असतातच पण एकाच स्थळातील/काळातील बालपणही सतरंगी असतात. शिवाय या ऐकण्याच्या प्रक्रियेचा सर्वात जास्त आनंद घेतात ती ही लहान लेकरंच.
आपण मोठे असतो,पण तरी खास त्यांच्यासाठी आपलं लहान होणं...मुद्दाम पडणं/रडणं , तोंड वेडीवाकडी करणं  हे त्यांना समजत असतं. त्यांना त्याचं अप्रूप असतं.
हे अप्रूप वाटून घेणं जेव्हा तुमच्या दिनाक्रमाचा भाग असतो तेव्हा प्रत्येक क्षणाला तुमच्या बालपणांमध्ये नवनवी बालपणे मिसळत जातात. तुम्ही समृद्ध होता की नाही माहित नाही पण तुम्ही बालक होत राहता आणि ही बाल्यावस्थाच तुम्हाला चिकित्सक बनवते, जीवनाविषयी उत्सुक बनवते, लहान लहान गोष्टींमधला आनंद घ्यायला शिकवते.
नाहीतर कामावर रुजू झाल्यापासून रिटायर होण्यापर्यंतच्या काळात कसं सुरक्षित म्हातारं होता येईल याचंच नियोजन करत राहतो आपण सगळेच प्रौ'ढं'.

-प्राजक्ता.

Thursday 25 August 2016

अंतरं...

माणसांपेक्षा अंतरांशी करार करावेत. समांतर वाटचाली असं काही नसतंच पण अंतर असतं हे खरंच. अंतरांचं असणं एकदा स्वीकारलं कि मग जाणिवेच्या पातळीवर हा निर्णय उगवतो की ते पार करायचं अथवा नाही. काहीवेळेस काहीप्रमाणात ते पार केले जाते. प्रमाण हे वेळेनुसार बदलणार. म्हणजे कमी जास्त होत जाणार. त्यामुळे कायमच ते सम नसणार. समांतर नसणार. अशी समांतर फक्त यंत्रे धावू शकतात रुळावर आणि यंत्रांमध्ये आरूढ आपण ती फसवी सादृश्यता(ऍनालॉजि) स्वतःसाठी आणि इतरांमधल्या आखलेल्या किंवा आखल्या गेलेल्या अंतरांविषयी ग्राह्य धरू लागतो. त्यामुळे शाळेत जरी असं भासवलं जात असलं की "प्रत्येकीनेच एका हाताचं अंतर ठेवून सगळ्या कसरती पार पाडायच्या हे शक्य आहे",तरी ती अंतरं कमी जास्त होत असतात हे आपणही अनुभवलेले असते. काहींसोबतचे अमुक इतके अंतर खूप जास्त वाटते तर काहींसोबत तेच  अंतर खूप कमी तर काहींसोबतच्या अंतराचा हिशेब ठेवण्याइतकेही महत्व आपण त्याला देत नाही.
अंतराचा मान राखायचं विसरलो आपण कि अंतरे आपला मान नाही राखत. असं परस्परावलंबी हे नातं.म्हणजे खरं नातं हे आपण आणि कोणी एक  व्यक्ती यात असतं कि आपल्यात आणि आपल्या दोघांमधल्या अंतरात असतं; हे कळत नाही... धूसर होत जातं चित्र आणि पर्यायाने नाती.

तर हेच. अंतर खरी . ती टिकणारी. माणसं बदलतात. तुम्ही बदलता. अंतर आणि माणसं यांच्या जोड्या गुणोत्तरे बदलतात पण अंतरं असतातच. त्याचं अगदी उदात्तीकरण करणंही काही गरजेचं नाही. तसं करणं हे आपल्या कल्पनाविश्वातील अद्भुतरम्यतेचा भयंकर तुटवडा असल्याचं लक्षण आहे असं म्हणावं फारतर. चालत राहिलं कि हे असले अंतर मोजण्याचे चोचले सुचत नाहीत. रेंगाळत राहिलं कि मग काय वाऱ्याने हलणारी पाने किती आणि त्या पानांच्या धक्याने हलणारी पानं किती याचा तक्ता मांडत बसतो आपण. हलत राहणं महत्वाचं. चालत राहणं महत्वाचं. करार करत राहणं-मोडत राहणं महत्वाचं.

-प्राजक्ता.

Wednesday 15 June 2016

शिडानेच मांडावा गलबताशी तंटा!


मावळतीच्या काळोखात
विरून जाण्यापूर्वी
उद्याची स्वप्ने
पडायला हवीत
हे या अस्वस्थ निद्रेला
सांगून कळत नाही...

भूतकाळाची अतार्किकता
भविष्याच्या अनिश्चिततेला
जिथे छेदते
त्या वाटेवर वर्तमान
गपगुमान वळत नसताना

शिडानेच मांडावा गलबताशी तंटा!

मार्गाचा अट्टाहास
मार्गस्थ होण्यापासून
वेगळा काढताना
होणाऱ्या बदलाच्या स्पर्शाने
कोणतीच दिशा मळत नाही...

-प्राजक्ता.
#एकमुक्तती.

Tuesday 3 May 2016

कविता रुजत जातात...

मी माझ्यातल्या कवयित्रीला विचारलं
तू कुठून येतेस?
ती म्हणे कवितेतून,
मी कवितेला विचारलं
तू कुठून येतेस?
ती म्हणे शब्दांतून,
मी शब्दांच्या संदिग्ध मालेला विचारलं
ग बाई तू कुठून येतेस?
ती म्हणे
तुझ्यातूनंच!

मी म्हंटल खोटं
साफ धडधडीत खोटं.
मी न पाहिलेल्या काळोखाचे
व्रण माझ्यावर उमटतात
न अनुभवलेल्या लक्ख प्रकाशाने
घेरलं जातं मला
हे सारं माझं नाही
मी यांची नाही
आम्ही एकमेकांचे नाही.
मग कोणाचे? कोण आहोत?
प्रश्न अनुत्तरीत राहतात
कविता रुजत जातात...

-प्राजक्ता
#एकमुक्तती.

Sunday 1 May 2016

जगण्याची कला!

जगणं शिकत नाहीच कोणी... आपलं तीळ तीळ मरणं लपवायला शिकतो फक्त आपण. ती एक कला आहे. जगण्याची कला! आणि आपल्यातले कित्येकजण आपापल्यापरीने कलाकार आहेत.

हे 'लपवणं' इतरांपासून लपवणं असू शकतं आणि अगदी खुद्द स्वतःपासूनही. अज्ञानातलं सुख शोधण्याचा एक भोळा प्रयास. 'माहित नाही' म्हणजे ते 'घडत नाही' असं नसतं. पण 'आपल्या माहितीत ते घडत नसतं' . याची देही याची डोळा बघत नसलो आपण किंवा मुद्दाम पाठ फिरवून उभे असलो आपण तरी त्रास हा होतोच. हा, फक्त तो लपवावा लागत नाही. साक्षीदार झालात तर मग कसरत करावी लागते. मनात एक अन् चेहऱ्यावर एक असं येऊ न देण्याची.

'जगण्याला सामोरे जा' म्हणजे 'खोल दरीत उडी मारा' असा सल्ला वाटावा इतकं भीषण जगणं असतं काहींचं.  तेव्हा दरीकडे पाठ फिरवून उभं राहणंच सुरक्षित वाटतं... आणि अगदीच सौख्यभर जगायचं असेल तर मग पाठ फिरवल्या बरोब्बर दरीला पाठमोरं टाकत पुढे निघून जायचं.

अज्ञानातलं सुख अर्थातच फसवं असू शकतं, पण पर्याय नसतो. स्मरणशक्तीच जेव्हा घात करू लागते तेव्हा तिच्या  शत्रूपक्षाची मुद्दाम आळवणी करणं भागच असतं. पण हेही खरं की विस्मरणशक्तीचा कृपाप्रसाद मिळवणं अधिक कठीण काम. म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर - रट्टा मारा, कशाना कशाशी ती सलंग्न करा, जळी स्थळी काष्ठी पाषाणी ती दिसत राहील याची तजवीज करा...स्मरणशक्तीसाठी हे पुरेसं आहे. पण काही विसरायचंय म्हणा! ते आठवत राहते. बे दुणे चार हे विसरायचं विसरायचं म्हणत राहा...अनावधानाने तुम्ही रट्टा मारताय, उजळणी करताय...
स्मरणशक्ती देवी प्रसन्न !!! __/\__

काय काय विसरायचंय याची यादी करत गेलो तर मग आठवत नसलेल्या आठवणीही आठवतात. एकदा जगलेलं पुन्हा पुन्हा जगत गेलो आठवणीत की मग अधोरेखित होत जातं त्यांचं अस्तित्व. आणखी कुचंबणा. अशा अनेक कुचंबणांना व्यक्ती सामोरं जाते, तरी जगते...हसते, कधी क्षुल्लक वाटाव्या अशा कारणांसाठी रडते, कटिंग मारते अन् डावी उजवीकडे बघून रस्ताही क्रॉस करते.

ना आपल्याला जगावं कसं हे शिकवलं जातं; ना जगणं नाकारावं कसं हे! प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार दोन्ही गावांचे पत्ते विचारत विचारत जिथे पोहोचावं वाटतं तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार. खरंतर जगावं का?आणि कशासाठी यावरच बरंच काही बोललं जातं. तसं असलं तरी प्रयोजनाची व्यक्तीनिष्ठता वैश्विक उत्तरापर्यंत पोहोचू देत नाही. आपण ज्या कारणासाठी जगतोय असं आपण समजत असतो त्याच कारणामुळे आपण तीळतीळ मरतही असू!...ग्लास अर्धा भरलेला कि रिकामा जुनी गोष्ट आहे, ती सोडा. पण प्रयोजनाच्या साध्यतेनंतरही आपण मग खऱ्या अर्थाने जगू का?... बहुदा नाहीच. जुन्या प्रयोजनाची जागा नवीन प्रयोजन घेते किंवा प्रयोजन प्राप्तीच्या देवत्वाला टाकीचे घाव काही विसरता येत नाहीत. ते टाकीचे सोसलेले घाव आठवताना नजर कोरडी ठेवण्याची कला जमली म्हणजे 'तीळतीळ मरणं लपवणं जमलं'. पण जगाच्या दृष्टीने याचा अर्थ तुम्ही 'जगणं शिकलात' असाच होतो.

जगणं शिकणं ही संज्ञाच फसवी आहे. लपाछुपीचा डाव फक्त रंगवत नेतो आपण.
लहानपणी आपण स्वतःला लपवतो;
अन् पुढे जाऊन समजूतदारपणे आपल्या भावना , वेदना, स्वप्नं...!

-प्राजक्ता.


Thursday 7 April 2016

मेळघाट डायरी : एक फोटो एक आठवण.

मनुष्याचे म्हणे तीन चेहरे असतात. एक जो इतरांना माहित असतो, एक जो आप्तेष्टांता माहित असतो
आणि एक जो स्वतःला माहित असतो.
पण त्याही पलीकडे आपल्यात अश्या काही भल्या-बुऱ्या गोष्टी असतात की आपल्यालाही माहित नसतात.
मेळघाटात जाण्याचा निर्णय हा पहिला असा निर्णय होता जो 'आतला आवाज' ऐकून कोणताही विचार न करता घेतला होता. स्पर्धा-परीक्षा करणाऱ्यांना बरेच निर्णय,छंद, छंदवर्ग पुढे पुढे ढकलण्याची सवय असते... (कदाचित सर्वच क्षेत्रातल्या लोकांचा हा अनुभव असू शकतो पण मी माझ्या अनुभवविश्वापुरतं सध्या बोलतेय.) त्याप्रथेनुसार हा ही एक निर्णय असाच जो मला नंतर कळला कि माझा छंद आहे.
छंद झाला. सामाजिक कार्याची आवड वगैरे सगळ्या पोकळ बाता आहेत. वर्षातले 10 दिवस हा काही कार्य म्हणण्याइतका कालावधी नाही. आणि सामाजिक हेतू तर यात शून्यच. एक व्यापक स्वार्थ यात मला सापडला. समाधान देत गेला. देत आहे. Everyone is self centred, it's just radius that differs अस वाचलेलं त्याचा प्रत्यय या अनुभवाने दिला. मला काहीतरी आनंद देत राहत ते सामाजिक हेतूने प्रेरित नसतच. तो स्वार्थच. प्रेमाचा. आपुलकीचा.

मुलामुलींसोबत दरवर्षी आम्हीही शिकत गेलो. 100 दिवसाची निवासी शाळा ही सर्वात जवळची वाटत राहते कारण पूर्णवेळ आम्ही मुलामुलींसोबत काहीनाकाही explore करत राहायचो.
पुढे खरा व्यवस्थेशी संपर्क येऊ लागला. आदर्शवादी काल्पनिक जगातून वास्तवाकडे नेलं मैत्रीच्या पुढच्या प्रयोगांनी. तो गरजेचाही होता.

आपल्याला काहीच येत नाही आपण काय दुसऱ्यांना शिकवणार या न्यूनगंडातून बाहेर काढायला मदत केली ती आमच्या मेळघाटातल्या या बच्चेकंपनींनी.
त्यांच्यासाठी त्यांच्या समोरचे दीदी-दादाच सर्व काही असतात. बाहेरच्या जगातून आलेले सर्वज्ञानी. पण म्हणून तुमच्या चरणाचं तीर्थ बिर्थ ते पित बसत नाहीत कधीच. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत नाहीत. विनाकारण तुमचा उदोउदो करत बसण्यात त्यांना रस नसतो. म्हणजे आपल्यात जे काही उच्च आहे त्यांची ओळखही ते आपल्याला करून देतात आणि पुन्हा डोक्यात हवाही जाऊ देत नाहीत.

मला शिकवता येत नाही. आणि चिल्यापिल्यांना तर नाहीच नाही या मताचीही मी होते, जातानाच Ashwini ताई, Vaishaliताई आणि शोभा ताईंना तस म्हंटलेलंही मी, पण त्यांनी जो विश्वास तेव्हा दिला तो खरच कामी आला. शिवाय तिथे गेल्यावर हेही जाणवलं कि त्या बाळांनी आपणच माझ्यातल्या शिक्षकाला घालवून दीदीला मोठं केलं.शिक्षकाची जी अनावश्यक छबी मनात बनलेली असते त्यात एक मुद्दा असतो परिक्षणाचा आणि हुशार बिशारचा शिक्का मारण्याचा. दीदी दादा हे करत नाहीत. ते बघतात की शारदा आपलं नाव चुकीचं लिहितेय कितीही शिकवलं तरी,
मग ते तिला शरद लिहायला शिकवतात
मग शारादा
मग शारदा... फरक ओळखायला सांगतात.
निव्वळ पाटीवर नाही झाडाखाली मातीत किंवा कॅम्पसमधल्या भिंतीवर किंवा तिने काढलेल्या चित्रात कुठेही. शारदा जेव्हा आपलं नाव नीट लिहू लागते तेव्हा सामान्य शिक्षकाला प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुलीला पाहून जो आनंद होईल तो आनंद दीदी-दादाला होतो. आपल्या सामान्य शिक्षण व्यवस्थेत इतका वेळ कोणाकडे आहे? या प्रश्नावर मी अस म्हणेन की नको त्या गोष्टींवर भर न देता निव्वळ आकलनावर भर दिला आपण तर खूप गोष्टी सोप्प्या होतील. आकलन फक्त विद्यार्थी-विद्यार्थिनीचंच नाही तर आपलंही. मूला-मुलींना आदर्श समाजाची तत्वे मूल्ये शिकवताना ती काल्पनिक वाटू नयेत म्हणून खराखुरा आदर्श समाज घडवण्याची सर्वतः जबाबदारी आपली आहे हे आपण सोयीने विसरून जातो. 

2012मध्ये पहिल्यांदा जेव्हा मेळघाटात गेले तेव्हा पासून आतापर्यंत जितक्यांदा गेलेय तितक्यांदा वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध झाले आहे. तुम्ही माझ्याशी कशाबद्दलही बोला पण -मेळघाट, तिथले मुलमुली,आरोग्य मैत्रिणी, गाव मित्र, Madhu भाऊ, Chandrakant(चंदू)भाऊ,Rameshwar(राम)भाऊ, Ramesh भाऊ, दिलीप भैय्या, Rajaram(राजा)भाऊ हे सगळे कसे ना कसे माझ्या बोलण्यातून येत राहतील. कारण ते आता माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाले आहेत.

Raju J. A. Kendre Arpita Ghogardare Nikita Joshi Babloo Ahiwale ही गॅंग जरा उशिराच भेटली पण त्यांनीही मेळघाट माझ्यासाठी आणखी स्मरणीय केलं आहे. (आणि त्यांचा नीचपणा पाहता मला यापोस्ट वरून काहींना काही बोललं जाईल अशी खात्री वाटत असूनही त्यांना टॅग करते आहे तर मेळघाटाने मला धाडसही दिले आहे अस मी म्हणेन :D )

मेळघाट मित्र हे कायमचे घर झाले आहे आता आणि चिलाटी गाव. आज या फोटोच्या निमित्ताने सगळं एकत्र समोर आणून ठेवलं झुक्याभाऊंनी.

फेबूच्या स्मरणिकेत आज हे दाखवलं गेलं... या स्मरणिकेचं
एक बरं आहे... भूतकाळात आपण किती मूर्ख होतो हे दाखवणाऱ्या पोस्ट्स डिलिट करून टाकत राहायच्या आणि अश्या पोस्ट्स आल्या समोर की तो अनुभव देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. आभासी असलं तरी जवळचं होतं अश्याने हे जग. :)

-प्राजक्ता.

Monday 22 February 2016

भविष्यातल्या एका संवादातून...

"एका आटपाट नगरातल्या एका टपरीवर.

१: तुला माहित्ये मला मत आहे!
२: त्यात काय एवढं? मलाही आहे.

१: तुझंही तेच मत आहे का जे माझं आहे?
२: काही कल्पना नाही बुवा.

१: माझं हेहे मत आहे
२:  ओह् ! नाही नाही माझं तेते मत आहे.

१: काय!!!!!! कस शक्यय? हे तेते चुकीचं आहे.
२: असं काही नसतं बघ. तुझ्यादृष्टीने तुझं मत मोलाचं मला माझं.

१:पण हे संयुक्तिक नाही. दोन सत्ये कशी असू शकतात?
२: काहींच्यामते तर 7 सत्ये असतात.

१: विषयाला फाटे फोडू नकोस. तुला मत बदलावं लागेल.
२: ठीके चर्चा करू
१: तुम्ही नियम बाह्य वर्तन करत आहात.
शिक्षा ही झालीच पाहिजे.

...मग यांनी नारे दिले. त्यांनीही दिले. यांनी त्यांचे हाणामारीचे मार्ग अवलंबले त्यांनी गोळा होऊन शब्दांच्या फैरा झाडल्या. मग त्यातून पुढे नियमांचे संकेतीकरण नव्याने झाले. प्रस्थापितांच्या संगीतखुर्चीत जो पर्यंत संगीत थांबलंय तोपर्यंत खुर्चीतल्यांचे नियम चालवायचे हाच एक अलिखित नियम झाला."

भविष्य: मग?

भूतकाळातील वर्तमान: मग काही नाही. आपल्यासारखे बघे फक्त मतामतातला फरक करायला शिकू लागले आणि जगणं सुसह्य झालं.

भ: तो कसा?

भू. व. : मत ( ओपिनियन ) आणि मत ( वोट )
यातला फरक.

भ: मग मला कोणतं मत असायला हवं?

भू.व. : कार्ड मिळेपर्यंत पाहिल्यावर काम कर.
कार्ड मिळाल्यावर दोन्हींवर करायला शिक.

भ: :)

-प्राजक्ता.
#आशावादी_राहीन_म्हणते.

Thursday 11 February 2016

अर्पणपत्रिका

मागे बरंच काही चालू असताना ती बोलत होती...
"... माझ्या शब्दांमध्ये मला शोधू नका...
कारण 'ती' मी अजून मलाही माहित नाहीए. अजून घडतेय की उलगडतेय... हेही ठरायचंय.
'तुमच्या सोबती'ची मी ही 'त्यांच्या सोबती'ची मी नसते.
'इथली' मी ही 'तिथल्या' मी पेक्षा वेगळी असते.
अर्थात, 'विरोधाभासी' (contradictory) नाही किंवा 'विखंडीतही' (fragmented) नाही. 
एकसंध आहे ... अपरिपूर्ण (Imperfect) असले तरी. 
माझे शब्द म्हणजे मी नाहीए, तर जगाला अनुभवतानाचे माझे ते उद्गार आहेत.
फक्त माझ्याच नाहीत तर ओळखीच्या/अनोळखीच्या अनेकांच्या नजरेतून मला दिसणारं असं काही आहे ते. नाही; नैतिक जबाबदारी झटकण्याची ही पद्धत वगैरे नाहीए.
खरंतर या विश्वातलं नेमकं माझं असं विश्व कोणतं आणि इतरांचं कोणतं?... हे वेगळं काढणं जमत नाही अजून! परस्परांना आच्छादून टाकत त्यांची द्वैत-अद्वैताची लपाछुपी चालू असते विचारांच्या गल्लीत.
त्यामुळे शब्दांची निष्ठा संदर्भानुसार बदलत राहते. हा काही विश्वासघात-बित म्हणता येणार नाही.
 त्यानिमित्ताने निरनिराळ्या छटा कळतात... न्याहाळत राहणं सध्याचा अजेंडा.
ठरेल हळूहळू स्वतःच्या अवकाशात कोणते रंग भरायचे; भरायचे किंवा नाहीत ते.
तोपर्यंत या भेटणाऱ्या शब्दांचे ऐकत राहावंच लागेल..."

... अजूनही सवय गेली नाहीए म्हणजे. तसंच विस्कळीत बोलत राहणं. समोरच्या व्यक्तीला एक धागा सापडतो ना सापडतो तो दुसरी रीळ सोडायची. शेवटचे भेटलेलो...(भांडलेलो!) तेव्हाही असंच काही शब्द होते. म्हणजे रागाने भरलेले पण शांत, निग्रही. आपण आपल्या ठामपणावरही ठाम राहू शकत नाही आणि हिच्याकडे मात्र 'ढिलाई ही इतकी ताठर असू शकते' असं वाटावं इतका ठामपणा. तेव्हाही हेवा वाटायचा.पण असो...
काय बरं शब्द होते ते?? अगदीच पोएटिक वगैरे ??!!! हां!!! "आठवण आलीच कधी तर विसरण्याचा प्रयत्न कर, आणि आलो समोरासमोर कधी आपण तर टाळण्याचा प्रयत्न कर"..... ( तिचं हे नेहमीचंच ; स्वतःला जमणार  नाहीत ती  कामं  इतरांना करायला सांगायची...) सांगितलं होतं, टाळण्याचा प्रयत्न कर म्हणून.... तरी अक्खा सत्कार सोहळा पाहिला आपण. इतक्या गर्दीत आपण शेवटून 11व्या रांगेत आणि पुढून बहुदा 2..5..7...8....10 आणि ही 13; हां 13व्या रांगेत बसलो आपण, म्हणजे लवकर येऊनही पुढे जागा मिळत असतानाही आपण या अधल्या मधल्या रांगेची बसण्यासाठी निवड केली. म्हणजे शब्द पाळलाच आपण. टाळलंच आपण नजरेच्या टप्प्यात येणं. दिसलो असू का आपण? वाटत नाही. एखादं तरी वाक्य आपल्याला उद्देशून आलंच असतं ना पूर्ण भाषणात! तशी धार वाटली नाही आज. तिरस्कारही कमीच वाटला. कसं असतं ना,आपण आपल्याला माफ केलं म्हणजे अगदी दुसऱ्यांच्यावतीनेही आपण स्वतःला सहज प्रशस्तिपत्रक देऊन मोकळे होतो.
"इतकी वर्ष झाली आता थोडीच तितका राग असणार आहे कोणाला? छे! "
असं मोठ्याने पुट्पुटल्यावर आपल्याला भान आलं की कोणाचा धक्का लागला तेव्हा आलं हे अजूनही कळलं नाहीए. पण भाषण बाहेर थांबायच्या आधीच इथे आत ऐकणं कधीचंच थांबलं होतं हे ध्यानात आलं. 

"स्टेशनला जायला बस कुठे मिळेल?" असं एकाला विचारू म्हंटल तर त्याच्या हातातल्या पुस्तकातला बुकमार्क बघून नकोच म्हंटल त्याच्याशी बोलायला. हाताहातात पुस्तक दिसतायत. किंमत कमी आहे की खरंच खपतंय आमचं  एकत्रित दुःख जोमाने? गम्मत म्हणजे आपणही विकत घेतलीये त्या दुःख-विच्छेदनाची एक प्रत!!! उरलेले पैसे ??? घेतलेच असतील. बुकमार्क? एक मिनिट...bag उघडून पाहिलं. अरे हो आहेच यातही!
पुस्तकावर फ्री आणि वर हे quote!!! श्या मूर्खपणाच झाला. बुकमार्कला घाबरून त्या माणसाशी बोललो नाही आपण !!! (बस कळली तरी असती). कॅन्टीनचा चाचा नेहमी म्हणायचा - जिसको ढूंडा गली गली वो घर के पिछवाडे मिली... आलोच आहोत तर त्यालाही भेटावं का ?
"भैया भैया स्टेशन आओगे??" श्वास उच्छवास ह्या क्रिया ज्या सहजपणे नकळत पणे घडत जातात तसंच झालं. स्टेशनला जायची बस विचारत बसण्यापेक्षा रिक्षा करून जाण्याचा निर्णय आपल्या नकळत आपल्या मेंदूने कधीच घेतला होता बहुतेक. त्याशिवाय का आवाज फुटला आपल्या तोंडून?
बसताना विचार आला याच घाईने तर पर्याय निवडले नाहीत ना आपण? निर्णय घेतले तेव्हा भान होतच किती आपल्याला? वाहत्या पाण्यासोबत गटांगळ्या खात 'आता हे बरोबर' 'मग ते' असं वाटत राहिलं आणि
 मग...कधी आपण रिक्षात बसलो तेही कळलं नाही आपल्याला.
पण रिक्षाशिवाय तसाही पर्याय होताच कुठे आपल्याला- आपल्याच कोर्टात आपल्याच खटल्यात आपणच आपली बाजू मांडण्याचा हा प्रकार! पण खरंच काय केलं असतं आपण थांबून? 

दुसऱ्या कोणाला विचारलं असत काही आणि विषय वाढत वाढत गेला असता मग ते म्हणाले असते कि
"का हो? तुमचा कसा परीचय यांच्याशी?'' किंवा
आयोजकांची गाडी गेली असती तिथूनच मग काय केलं असतं? 
तेव्हा हेच बरं केलं आपण. काहीही विचार चालू होता हे खरं असलं तरी वाटणारी भीती खोटी नव्हती. 
"आयुष्य अगदीच सोप्प असतं असा गुंतगुंतीचा विचारच का करा?" असं तिनं म्हंटल्यावर आपण नेहमी म्हणायचो ते या भीतीसारखंच खरं होतं- "आयुष्य अगदीच सोप्प असतं; कठीण असतं ते या मतावर ठाम राहणं"... 
'शब्दांचं ऐकावं लागेल' म्हणणार्यांनी आपलं कधी ऐकलंच नाही ही भावना शरीरभर पसरली अचानक. 
नवनवीन प्रेमात पडणारे आपल्या लेकरांची नावं ठरवतात आम्ही कव्हरपेजचा रंग ठरवला होता...रंग एकच पण त्याच्या 3 छटा वापरायच्या हेही ठरलंच होत. गर्दीच्या भीतीने आपण पुस्तकही नीट पाहिलं नाहीए असं जाणवलं तेव्हा "छब्बीस रुपया"झाले होते.
नेहमी प्रमाणे सुट्ट्याच्या अभावी वरच्या 4ला मुकत स्टेशनात घुसणं ओघाने आलंच. बुकमार्क मुद्दामच दिला असणार फुकट. म्हणजे कशी ना कशी तरी ती तीक्ष्ण धार पोहोचायची होतीच आपल्याकडे. पोहोचलीच आहे तर आता सामोरं  जाऊयाच.
पुस्तक बॅगेतल्या एका कप्प्यात होतं. आपण गर्दीला घाबरूनच लगेच घेतल्या घेतल्या बॅगेत टाकलं होतं हे आठवतंय स्पष्ट. पण अजून हे धूसर आहे कि खरंच ती भीती नेमकी कोणाची होती?
गर्दीची? तिची? कि स्वतःची?
का भीती नव्हतीच ती? सुप्त इच्छा होती ती... पकडावी कोणीतरी आपली चोरी. कळावं कोणालातरी कि 'प्रवेश निषिद्ध' प्रदेशात घुसलोय आपण ते. 

तीनही छटा वापरल्या आहेत तर. यातच भरून पावलं होतं खरं म्हणजे. आता पुस्तक वाचायचीही गरज नव्हती. "अरे च्यायला तू इकडे कुठे?" मग कसायस, केलं कि नाही लग्न? अरे त्या दंड्याने साल्याने गांगोटेच्याच पोरीला पटवल्ल!!!  अनुला मुलगी झाली कालच, बायको सिरीयस आहे म्हणतात... बारक्याचा business मोठा झालाय फार! आणि काय आजपण पुस्तकं खरेदी का ??? ढिम्म बदल नाहीए तुझ्यात!!!" हे एवढं काही एका दमात बोललं गेलं तोंडावर... तेव्हा म्हंटल जाऊदे जवळचाच असणार आपला; त्याशिवाय का इतका बोलतोय !
नाव- गाव- फळ- फुल -आवड- निवड -सवड...  अश्या सगळ्या बातम्या असल्या आपल्याकडे एखाद्या/दि विषयी की "आपलं माणूस" हा शिक्का बसतो त्यांच्यावर. कधी आपण मारतो कधी समोरचे स्वतःहून येतात शिक्क्याखाली. अभिमानाची गोष्ट असते म्हणतात -आपण ;लोकांचे "आपलं माणूस'" असणं !...
तर हा 'आपला' बराच बोलत होता... आणि या देहाने रिक्शात बस्ताना संचारलेल्या त्या उर्जेनेच त्याच्या बऱ्याचश्या प्रश्नांना उत्तर दिली होती... तेही भलंच.
"कसली पुस्तकं वाचतो रे! काये हे?? अर्पणपत्रिकाच कशीए कॉमप्लिकेटेड"
बोलता बोलता आपली माणसं हात  हातात घेतात सहसा,याने हातातलं पुस्तक कधी घेतलं कळलच नव्हतं.

"उघडलंच नाहीए रे अजून, फ्रंटपेजच आवडलं खुप.  म्हणून म्हंटल बघू घेऊन"
जे बोललो ते ऐकल्याचं दाखवत तो-
"ठीके चल निघतो,गाडी लागेलच इतक्यात... ग्रुप वर ऍड करतोच तुला, बोलू मग"
बाय करायला त्याच्याकडे पाहणं अपेक्षित असतानाही थेट पुस्तक उघडलं गेलं हातून..

'अर्पणपत्रिका

अवकाशात भरायच्या राहून गेलेल्या 
तीनही छटांच्या एका रंगास '

तिथेच उभं असूनही गाडी सुटली होती… लक्षात आलं.

-प्राजक्ता.