Monday 22 February 2016

भविष्यातल्या एका संवादातून...

"एका आटपाट नगरातल्या एका टपरीवर.

१: तुला माहित्ये मला मत आहे!
२: त्यात काय एवढं? मलाही आहे.

१: तुझंही तेच मत आहे का जे माझं आहे?
२: काही कल्पना नाही बुवा.

१: माझं हेहे मत आहे
२:  ओह् ! नाही नाही माझं तेते मत आहे.

१: काय!!!!!! कस शक्यय? हे तेते चुकीचं आहे.
२: असं काही नसतं बघ. तुझ्यादृष्टीने तुझं मत मोलाचं मला माझं.

१:पण हे संयुक्तिक नाही. दोन सत्ये कशी असू शकतात?
२: काहींच्यामते तर 7 सत्ये असतात.

१: विषयाला फाटे फोडू नकोस. तुला मत बदलावं लागेल.
२: ठीके चर्चा करू
१: तुम्ही नियम बाह्य वर्तन करत आहात.
शिक्षा ही झालीच पाहिजे.

...मग यांनी नारे दिले. त्यांनीही दिले. यांनी त्यांचे हाणामारीचे मार्ग अवलंबले त्यांनी गोळा होऊन शब्दांच्या फैरा झाडल्या. मग त्यातून पुढे नियमांचे संकेतीकरण नव्याने झाले. प्रस्थापितांच्या संगीतखुर्चीत जो पर्यंत संगीत थांबलंय तोपर्यंत खुर्चीतल्यांचे नियम चालवायचे हाच एक अलिखित नियम झाला."

भविष्य: मग?

भूतकाळातील वर्तमान: मग काही नाही. आपल्यासारखे बघे फक्त मतामतातला फरक करायला शिकू लागले आणि जगणं सुसह्य झालं.

भ: तो कसा?

भू. व. : मत ( ओपिनियन ) आणि मत ( वोट )
यातला फरक.

भ: मग मला कोणतं मत असायला हवं?

भू.व. : कार्ड मिळेपर्यंत पाहिल्यावर काम कर.
कार्ड मिळाल्यावर दोन्हींवर करायला शिक.

भ: :)

-प्राजक्ता.
#आशावादी_राहीन_म्हणते.

Thursday 11 February 2016

अर्पणपत्रिका

मागे बरंच काही चालू असताना ती बोलत होती...
"... माझ्या शब्दांमध्ये मला शोधू नका...
कारण 'ती' मी अजून मलाही माहित नाहीए. अजून घडतेय की उलगडतेय... हेही ठरायचंय.
'तुमच्या सोबती'ची मी ही 'त्यांच्या सोबती'ची मी नसते.
'इथली' मी ही 'तिथल्या' मी पेक्षा वेगळी असते.
अर्थात, 'विरोधाभासी' (contradictory) नाही किंवा 'विखंडीतही' (fragmented) नाही. 
एकसंध आहे ... अपरिपूर्ण (Imperfect) असले तरी. 
माझे शब्द म्हणजे मी नाहीए, तर जगाला अनुभवतानाचे माझे ते उद्गार आहेत.
फक्त माझ्याच नाहीत तर ओळखीच्या/अनोळखीच्या अनेकांच्या नजरेतून मला दिसणारं असं काही आहे ते. नाही; नैतिक जबाबदारी झटकण्याची ही पद्धत वगैरे नाहीए.
खरंतर या विश्वातलं नेमकं माझं असं विश्व कोणतं आणि इतरांचं कोणतं?... हे वेगळं काढणं जमत नाही अजून! परस्परांना आच्छादून टाकत त्यांची द्वैत-अद्वैताची लपाछुपी चालू असते विचारांच्या गल्लीत.
त्यामुळे शब्दांची निष्ठा संदर्भानुसार बदलत राहते. हा काही विश्वासघात-बित म्हणता येणार नाही.
 त्यानिमित्ताने निरनिराळ्या छटा कळतात... न्याहाळत राहणं सध्याचा अजेंडा.
ठरेल हळूहळू स्वतःच्या अवकाशात कोणते रंग भरायचे; भरायचे किंवा नाहीत ते.
तोपर्यंत या भेटणाऱ्या शब्दांचे ऐकत राहावंच लागेल..."

... अजूनही सवय गेली नाहीए म्हणजे. तसंच विस्कळीत बोलत राहणं. समोरच्या व्यक्तीला एक धागा सापडतो ना सापडतो तो दुसरी रीळ सोडायची. शेवटचे भेटलेलो...(भांडलेलो!) तेव्हाही असंच काही शब्द होते. म्हणजे रागाने भरलेले पण शांत, निग्रही. आपण आपल्या ठामपणावरही ठाम राहू शकत नाही आणि हिच्याकडे मात्र 'ढिलाई ही इतकी ताठर असू शकते' असं वाटावं इतका ठामपणा. तेव्हाही हेवा वाटायचा.पण असो...
काय बरं शब्द होते ते?? अगदीच पोएटिक वगैरे ??!!! हां!!! "आठवण आलीच कधी तर विसरण्याचा प्रयत्न कर, आणि आलो समोरासमोर कधी आपण तर टाळण्याचा प्रयत्न कर"..... ( तिचं हे नेहमीचंच ; स्वतःला जमणार  नाहीत ती  कामं  इतरांना करायला सांगायची...) सांगितलं होतं, टाळण्याचा प्रयत्न कर म्हणून.... तरी अक्खा सत्कार सोहळा पाहिला आपण. इतक्या गर्दीत आपण शेवटून 11व्या रांगेत आणि पुढून बहुदा 2..5..7...8....10 आणि ही 13; हां 13व्या रांगेत बसलो आपण, म्हणजे लवकर येऊनही पुढे जागा मिळत असतानाही आपण या अधल्या मधल्या रांगेची बसण्यासाठी निवड केली. म्हणजे शब्द पाळलाच आपण. टाळलंच आपण नजरेच्या टप्प्यात येणं. दिसलो असू का आपण? वाटत नाही. एखादं तरी वाक्य आपल्याला उद्देशून आलंच असतं ना पूर्ण भाषणात! तशी धार वाटली नाही आज. तिरस्कारही कमीच वाटला. कसं असतं ना,आपण आपल्याला माफ केलं म्हणजे अगदी दुसऱ्यांच्यावतीनेही आपण स्वतःला सहज प्रशस्तिपत्रक देऊन मोकळे होतो.
"इतकी वर्ष झाली आता थोडीच तितका राग असणार आहे कोणाला? छे! "
असं मोठ्याने पुट्पुटल्यावर आपल्याला भान आलं की कोणाचा धक्का लागला तेव्हा आलं हे अजूनही कळलं नाहीए. पण भाषण बाहेर थांबायच्या आधीच इथे आत ऐकणं कधीचंच थांबलं होतं हे ध्यानात आलं. 

"स्टेशनला जायला बस कुठे मिळेल?" असं एकाला विचारू म्हंटल तर त्याच्या हातातल्या पुस्तकातला बुकमार्क बघून नकोच म्हंटल त्याच्याशी बोलायला. हाताहातात पुस्तक दिसतायत. किंमत कमी आहे की खरंच खपतंय आमचं  एकत्रित दुःख जोमाने? गम्मत म्हणजे आपणही विकत घेतलीये त्या दुःख-विच्छेदनाची एक प्रत!!! उरलेले पैसे ??? घेतलेच असतील. बुकमार्क? एक मिनिट...bag उघडून पाहिलं. अरे हो आहेच यातही!
पुस्तकावर फ्री आणि वर हे quote!!! श्या मूर्खपणाच झाला. बुकमार्कला घाबरून त्या माणसाशी बोललो नाही आपण !!! (बस कळली तरी असती). कॅन्टीनचा चाचा नेहमी म्हणायचा - जिसको ढूंडा गली गली वो घर के पिछवाडे मिली... आलोच आहोत तर त्यालाही भेटावं का ?
"भैया भैया स्टेशन आओगे??" श्वास उच्छवास ह्या क्रिया ज्या सहजपणे नकळत पणे घडत जातात तसंच झालं. स्टेशनला जायची बस विचारत बसण्यापेक्षा रिक्षा करून जाण्याचा निर्णय आपल्या नकळत आपल्या मेंदूने कधीच घेतला होता बहुतेक. त्याशिवाय का आवाज फुटला आपल्या तोंडून?
बसताना विचार आला याच घाईने तर पर्याय निवडले नाहीत ना आपण? निर्णय घेतले तेव्हा भान होतच किती आपल्याला? वाहत्या पाण्यासोबत गटांगळ्या खात 'आता हे बरोबर' 'मग ते' असं वाटत राहिलं आणि
 मग...कधी आपण रिक्षात बसलो तेही कळलं नाही आपल्याला.
पण रिक्षाशिवाय तसाही पर्याय होताच कुठे आपल्याला- आपल्याच कोर्टात आपल्याच खटल्यात आपणच आपली बाजू मांडण्याचा हा प्रकार! पण खरंच काय केलं असतं आपण थांबून? 

दुसऱ्या कोणाला विचारलं असत काही आणि विषय वाढत वाढत गेला असता मग ते म्हणाले असते कि
"का हो? तुमचा कसा परीचय यांच्याशी?'' किंवा
आयोजकांची गाडी गेली असती तिथूनच मग काय केलं असतं? 
तेव्हा हेच बरं केलं आपण. काहीही विचार चालू होता हे खरं असलं तरी वाटणारी भीती खोटी नव्हती. 
"आयुष्य अगदीच सोप्प असतं असा गुंतगुंतीचा विचारच का करा?" असं तिनं म्हंटल्यावर आपण नेहमी म्हणायचो ते या भीतीसारखंच खरं होतं- "आयुष्य अगदीच सोप्प असतं; कठीण असतं ते या मतावर ठाम राहणं"... 
'शब्दांचं ऐकावं लागेल' म्हणणार्यांनी आपलं कधी ऐकलंच नाही ही भावना शरीरभर पसरली अचानक. 
नवनवीन प्रेमात पडणारे आपल्या लेकरांची नावं ठरवतात आम्ही कव्हरपेजचा रंग ठरवला होता...रंग एकच पण त्याच्या 3 छटा वापरायच्या हेही ठरलंच होत. गर्दीच्या भीतीने आपण पुस्तकही नीट पाहिलं नाहीए असं जाणवलं तेव्हा "छब्बीस रुपया"झाले होते.
नेहमी प्रमाणे सुट्ट्याच्या अभावी वरच्या 4ला मुकत स्टेशनात घुसणं ओघाने आलंच. बुकमार्क मुद्दामच दिला असणार फुकट. म्हणजे कशी ना कशी तरी ती तीक्ष्ण धार पोहोचायची होतीच आपल्याकडे. पोहोचलीच आहे तर आता सामोरं  जाऊयाच.
पुस्तक बॅगेतल्या एका कप्प्यात होतं. आपण गर्दीला घाबरूनच लगेच घेतल्या घेतल्या बॅगेत टाकलं होतं हे आठवतंय स्पष्ट. पण अजून हे धूसर आहे कि खरंच ती भीती नेमकी कोणाची होती?
गर्दीची? तिची? कि स्वतःची?
का भीती नव्हतीच ती? सुप्त इच्छा होती ती... पकडावी कोणीतरी आपली चोरी. कळावं कोणालातरी कि 'प्रवेश निषिद्ध' प्रदेशात घुसलोय आपण ते. 

तीनही छटा वापरल्या आहेत तर. यातच भरून पावलं होतं खरं म्हणजे. आता पुस्तक वाचायचीही गरज नव्हती. "अरे च्यायला तू इकडे कुठे?" मग कसायस, केलं कि नाही लग्न? अरे त्या दंड्याने साल्याने गांगोटेच्याच पोरीला पटवल्ल!!!  अनुला मुलगी झाली कालच, बायको सिरीयस आहे म्हणतात... बारक्याचा business मोठा झालाय फार! आणि काय आजपण पुस्तकं खरेदी का ??? ढिम्म बदल नाहीए तुझ्यात!!!" हे एवढं काही एका दमात बोललं गेलं तोंडावर... तेव्हा म्हंटल जाऊदे जवळचाच असणार आपला; त्याशिवाय का इतका बोलतोय !
नाव- गाव- फळ- फुल -आवड- निवड -सवड...  अश्या सगळ्या बातम्या असल्या आपल्याकडे एखाद्या/दि विषयी की "आपलं माणूस" हा शिक्का बसतो त्यांच्यावर. कधी आपण मारतो कधी समोरचे स्वतःहून येतात शिक्क्याखाली. अभिमानाची गोष्ट असते म्हणतात -आपण ;लोकांचे "आपलं माणूस'" असणं !...
तर हा 'आपला' बराच बोलत होता... आणि या देहाने रिक्शात बस्ताना संचारलेल्या त्या उर्जेनेच त्याच्या बऱ्याचश्या प्रश्नांना उत्तर दिली होती... तेही भलंच.
"कसली पुस्तकं वाचतो रे! काये हे?? अर्पणपत्रिकाच कशीए कॉमप्लिकेटेड"
बोलता बोलता आपली माणसं हात  हातात घेतात सहसा,याने हातातलं पुस्तक कधी घेतलं कळलच नव्हतं.

"उघडलंच नाहीए रे अजून, फ्रंटपेजच आवडलं खुप.  म्हणून म्हंटल बघू घेऊन"
जे बोललो ते ऐकल्याचं दाखवत तो-
"ठीके चल निघतो,गाडी लागेलच इतक्यात... ग्रुप वर ऍड करतोच तुला, बोलू मग"
बाय करायला त्याच्याकडे पाहणं अपेक्षित असतानाही थेट पुस्तक उघडलं गेलं हातून..

'अर्पणपत्रिका

अवकाशात भरायच्या राहून गेलेल्या 
तीनही छटांच्या एका रंगास '

तिथेच उभं असूनही गाडी सुटली होती… लक्षात आलं.

-प्राजक्ता.