Showing posts with label सामाजिक स्त्री-पुरुषता. Show all posts
Showing posts with label सामाजिक स्त्री-पुरुषता. Show all posts

Thursday, 11 October 2018

#MeToo पेक्षा आजच्या समाजाचे आभार __/\__

एक स्त्री म्हणून या काळाचे आभार मानावे वाटतात.
माझ्यातल्या घडत गेलेल्या स्त्रीला जागा करून
देणाऱ्या समाजाचे म्हणजेच तुमचे आभार मानावे वाटतात.

'बाईच बाईची वैरी असते' हा परवचा श्री/अ वगैरे गिरवायच्या आधीपासून आत्मगत करत मोठ्या होत असताना सुद्धा प्रवासात आजूबाजूला एखादी तरी बाई असली तरी हायसं मानत बाया हिंडल्या,
बाथरूमला जाताना सुरक्षितता म्हणून बायकांच्या घोळक्यात जायला संधी शोधत राहिल्या,
बाई दिसत नाही तोपर्यंत जीव मुठीत घेऊन कामं करत राहिल्या...
पुरुषांच्या पंगतीतून उठवून लावू नये म्हणून 'बायका कशा नखरेल असतात' या पुरुषांच्या बोलण्यात हामी भरत आपल्या तोंडचा घास काढून घेतला जाणार नाही याची काळजी घेत राहिल्या...
भानामती झाल्यासारख्या म्हणत राहिल्या की भेदभाव होत नाही... नोकरी सांभाळून  घरंचं काम करत राहणं, आई बनणं , त्याग वगैरे करणं हेच बाईपण.

पण आधी ब्र उच्चारु न शकणाऱ्या बाया शिकल्या सवरल्या,
ज्या अक्षरं नाही शिकू शकल्या त्या लढणं शिकल्या...तगनं शिकल्या... बोलू लागल्या.
आता तुम्ही समाज म्हणून त्यांना झिडकारून लावत असलात, खोटारड्या ठरवत असलात, त्यांच्या नोकऱ्या त्यांचे जीव धोक्यात आणण्याच्या धमक्या देत असलात, सोशल मीडियावर गलिच्छ शिवीगाळ करून,ट्रोल करून, मानसिक हिंसा ते शारीरिक हिंसेपर्यंत अशा विविध मार्गाने जात त्यांचं तोंड दाबून गप्प करण्याच्या प्रयत्नात असलात तरी...
तरी मला एक स्त्री म्हणून या काळाचे पर्यायाने तुमचे आभार मानावे वाटतात.

आज मायबापाने नाही ऐकलं तर अनोळखी बाया किंवा बाप्ये आहेत कार्यकर्ते/अधिकारी/संस्था म्हणून बाईच्या हुंकाराला ओ देणारे...
आज एकेक बाई उभी राहतेय 'मी सुद्धा' म्हणत
ती एकटी नाही याची हमी देत इतर बायांना, मुलींना बोलण्यास प्रवृत्त करतेय.
हा, बऱ्याच जणांना वाटतंय तरी आता हे 'मी टु' चं नवं फॅड आलं आहे, फेमस व्हायला या बाया काहीही खोटे नाटे आरोप करतात ताकदवान पुरुषांवर असे म्हणताहेत पण-
"काय प्रकारची प्रसिद्धी मिळते या अशा बोलण्याने? ज्या बाया बोलताहेत त्यांच भविष्यात काय होतं? आणि ज्या पुरुषांविषयी बोलतात त्यांच्या भविष्यावर सोडा पण त्यांच्या वर्तमानावर कितपत परिणाम होतो??" असे प्रश्न विचारणारे वाढताहेत, आत्मपरीक्षण करणारे बोटावर मोजणारे का असेनात पण ते आपलं अस्तित्व टिकवून ठेवताहेत किंवा आपण असे म्हणूया की समाज म्हणून तुम्ही तशी संधी त्यांना देताहात...

आज फेसबुकने अनोळखी लोकांनी मला माझे कपडे/शरीर/फोटो यावर केलेल्या अश्लील मेसेजेस सतत दिसणार नाहीत याची काळजी घेतली आहे,मला जेव्हा ते पाहावे वाटतील तेव्हा मी पाहून त्यावर हसू शकते किंवा रिपोर्ट करू शकते... आज रस्त्यावरच्या माझ्यावर कमेंट करणाऱ्या मर्दांना मी काहीच करू शकत नसले तरी सोशल मीडियावर त्यांना ब्लॉक करू शकते... अगदीच म्हणायचं झालं तर आज माझ्या न्युज फीड वर माझ्याच माहितीतल्या एखाद्या व्यक्तीने कोणतेही असंवेदनशील वक्तव्य केल्यास त्यांना अनफॉलो करू शकते.
वास्तविक आयुष्यात व्हर्च्युअल सारखं लॉग इन आणि लॉग आऊट करणं सोप्पं नाहीच पण किमान १० वर्षे , १६ वर्षे गेल्यावर का होईना मला नाकारलं गेलेलं काम मिळू शकतं, माझ्या भीतीवर मी मात करून पुन्हा ब्र उच्चारू शकते...
यासाठी तुम्ही समाज म्हणून जो वर्तमानपत्रातला रकाना देताहात मिडियातली जी स्पेस देताहात, चहाच्या टपरीवर आम्हा बायकांना येड्यात काढण्यासाठी का होईना पण चर्चेतून तुमचा वेळ देताहात... घरात बसून बातम्या बघताना आपल्या घरातल्या बायकांच्या बाबतीत असे घडत असेल का? त्यांचं या बाबतचं खरंखुरं मत काय असेल हे विचारत नसाल पण किमान तो विचार पूर्णतः झिडकरण्यापूर्वी एका सेकंदासाठी तरी त्याकडे चोरून का होईना, घाबरत का होईना तुम्ही बघायला लागला आहात...
बाया खोटे नाटे आरोप लावतील असा विचार करून का होईना पण बाईला चोरटा स्पर्श होणार नाही याची काळजी घेताहात,
जर तसा स्पर्श तुमच्याकडून झालाच चुकून तर माफी मागत आहात...
ज्यांना गर्भात मारता नाही आलं त्यांना रस्त्यावर बिनधास्त फिरायला मिळणाऱ्या  आयुष्यासाठी त्या बायांनी तुमचं ऋणी राहिलं पाहिजे या आवेशापासून हळूहळू लांब येताहात...

मुद्दा निव्वळ अलोक नाथचा नाही, मी महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र माझा असल्याने नाना पाटेकरांचा तर त्याहूनही नाही...मुद्दा तुमच्या-आमच्यातल्या पुरुष आणि स्त्री या आदिमत्वाचा आहे हे समजून घेण्याच्या दिशेने समाज म्हणून रांगायला लागला आहात... नर आणि मादी यापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून एकमेकांची दखल घेण्यापर्यंत आपला समाज पोहोचायला आणखी बराच काळ जाईल; पण तिथपर्यंत आपण पोहूचू या विश्वासाची ज्योत पेटवायला लागणाऱ्या वात, तेल , काडेपेटी इत्यादी साहित्याची जुळवाजुळव करायचा काळ सुरू झाला आहे...
म्हणून. आणि निव्वळ म्हणून एक स्त्री म्हणून या काळाचे आभार मानावे वाटतात.
#धन्यवाद.

तळटीप: जन्मभरात जितक्यांदा दादर स्टेशनला गेले तितक्यांदा माझ्या अंगावर फिरलेल्या हातांचे ठसे माझ्याकडे नाहीत.
बस मध्ये बसल्यावर मागच्या बाजूने आलेल्या हातावर जेव्हा मी फटका मारून ओरडले होते तेव्हा त्या काकांनी तसं काही केलंच नाही असं म्हंटल्याने त्याचाही पुरावा माझ्याकडे नाही...
प्रवासात कॉलेजमधल्या मुलींना मागून घसट करताना जेव्हा मी एका पुरुषाला पाहिलं तेव्हा फोटो काढायचा राहिला...
रेल्वेच्या डब्यात एकही बाई नाही,प्रवास लांबचा आणि रात्रीचा; आपली पोरगी सकाळी व्यवस्थित पोहोचेल का या चिंतेने ग्रासलेल्या माझ्या वडिलांच्या डोळ्यांचा स्क्रीनशॉट काढता आला नाही...
नाहीतर पुरावे बरेच देता आले असते.
पण हेही नसे थोडके की जगण्याचा ताण हलका करायला इथं फेबु वर येऊन कोणताही व्हीडिओ/कागद वगैरे पुरावा म्हणून नसताना इथपर्यंत वाचलं तुम्ही.

पुनश्च #आभार ...

-प्राजक्ता
#metoo

Friday, 30 September 2016

Independent लडकी....पिंकच्या निमित्ताने!

"Independent लडकी लडकों को confuse कर देती है।"
वाक्य अर्थातच सध्या चर्चेत असणाऱ्या चित्रपटातलं. #PINK मधलं.
चित्रपट पाहिल्यापासून वाक्य डोक्यात घुमतंय.
मागच्या पिढीचा अनुभव काय असेल सांगता येणार नाही, मात्र हे वाक्य माझ्या पिढीतल्या अनेक मुलामुलींना/ स्त्री पुरुषांना लागू आहे. 
हे वाक्य जर-
Independent लडकी को देख के [dependent] लडके confuse हो जाते है। असं असतं तर आणखी आवडलं असतं. असो.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात...
-ज्यांना निव्वळ 'घराला घरपण' देणारी बायको हवी असते. अर्थात या घरपणात भावनिक आधार किंवा मानसिक शांती हा फार खचितच मुद्दा येतो.
यांच्या लेखी घरपण म्हणजे-
कामावरून आल्यावर 'ती' स्वतः कामाला जात असली आणि दमली वगैरे असली,तरी नवऱ्यावरचं 'प्रेम(?)' दाखवण्यासाठी पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देते.
चार चौघात का होईना 'अहो' म्हणते.
'यांना विचारून सांगते'ची जागा हल्ली 'याच्याशी बोलून कळवते' ने घेतलेली असते. अर्थात यातही काही गैर नाही...जर हे एकमेकांशी सल्लामसलत करणं अन्योन्य (रेसिप्रोकल) असलं तर...आणि तरंच!

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात-
जे अभिमानाने सांगतात मला माझी आई/ताई/आजी/आत्या/मामी/काकी/ घरातली कोणतीही स्त्री साधं माझं जेवणाचं ताटही उचलू देत नाहीत. आमच्यात तशी पद्धतच नाही.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात- जे गरम पाण्याच्या बादलीमध्ये उभी राहून चपात्या करणाऱ्या आपल्या आईचा फोटो फेसबुकवर अपलोड करतात हे म्हणत - कि बघा खऱ्या आईचं प्रेम!! इतकं आजारी असून, पाय दुखत असूनपण,मुलाला गरम चपात्या खायला मिळाव्यात म्हणून माझी आई अशा परिस्थितीत पण चपात्या करते आहे!!!
हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात ज्यांना एरवी सोडा पण आई आजारी असतानाही साधी स्वतःची जेवणाची सोय करता येत नाही.

हे तेच 'डिपेंडेन्ट लडके' असतात ज्यांना वाटतं की ते पैसे कमवतात त्यामुळे ते स्वतंत्रवृत्तीचे आहेत पण आधी आई - मग बायको - मग सुनेवर  जेवण-खाणं-आंघोळीला जाताना टॉवेल देण्यापासून ते घरातला केर काढण्यापर्यंत डीपेंड राहत स्वतःची उष्टी स्वतंत्रता मिरवत राहतात.
आणि त्याउपर-
स्त्री जन्म हा आधी पिता - मग बंधू -आणि मग पुत्रावर विसंबून असतो अशा भाकडकथाही पसरवत राहतात.
व्यक्तिगत आयुष्यात पित्याच्या आणि बंधुच्या प्रचंड आधाराचा मला अनुभव आहे, पण त्या आधाराच्या कधी बेडया झाल्या नाहीत...तरीही हे असं बेगडी आधाराच्या नावावर राणीच्या बागेतल्या प्राण्यासारखं बाईला बंदिस्त करून ठेवलं जातं हा सार्वत्रिक अनुभव मला नाकारता येत नाही.

तथाकथित इंडिपेंडंट आयुष्य जगणाऱ्या पुरुषाला बाईच्या स्वातंत्र्याविषयी भूमिका घेताना राजदूतांच्या तोडीस तोड असं डिप्लोमॅटिक होताना पाहिलं आहे...
मग यात अनेक तर्क-वितर्क मांडले जातात-
>कुटुंबाचं स्थैर्य महत्वाचं
>बाहेर वातावरण कसलं आहे तुला जाणीव नाहीए
>गरजंच काय आहे?
>मुलांवर चांगले संस्कार व्हायचे असतील तर आईच लागते!
>एखाद-दुसऱ्या टक्के पोरींवर रेप होतात, तुम्ही काय त्याचा एवढा issue करता कळत नाही!

यादी तुम्हालाही वाढवता येऊ शकते.

मुद्दा हा आहे की पिंक मधलं हे वाक्य-
"Independent लडकी लडकों को confuse कर देती है।" चित्रपटातील संदर्भाच्यापलीकडेही लागू होतं.

Confuse होऊन तुमच्यातला पुरुष चित्रपटात दाखवल्याप्रमाणे शारीरिक बलात्कार करेलच असे नाही. पण या अशा पुरुषांच्या confuse मानसिकतेने अनेकींवर मानसिक जोरजबरदस्ती केलेली असते याची जाणीवही या कान्फ्युज्यांना नसते किंवा सोयीने ती दडपली जात असते.

स्वतः कमवणाऱ्या, स्वतःचे निर्णय घेणाऱ्या, एकट्या राहणाऱ्या, एकट्या हिंडणाऱ्या/फिरणाऱ्या किंवा स्वतःच्या निवडीनुसार माणसांची संगत करणाऱ्या अनेक स्वतंत्रवृत्तीच्या स्त्रियांची लग्न होताना किंवा झाल्यावर या स्वातंत्र्याविषयी अनेक तडजोडी कराव्या लागणाऱ्या स्त्रिया पाहिल्या आहेत. 

तेव्हा हाच विचार येतो.
'मुलीला स्वतंत्र बनायला इतकं सारं करावं लागतं.
मुलगा फक्त कमवता झाला की स्वतंत्र होतो.'
ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमचे अनेक १५ ऑगस्ट येतील नि जातील पण त्यात आम्ही झेंडा हा फक्त प्रतीक म्हणूनच फडकवत असू हे लक्षात असू द्या. चित्रपटात हे सगळं कुठे आहे विचाराल नाही का? चित्रपटाने यातलं काहीच थेट म्हंटलेलं नाही. पण चित्रपटातील समाज हा याच डिपेंडेन्ट आणि तरीही स्वतःला सत्ता स्थानी मानणाऱ्या  पुरुषसत्ताक मानसिकतेचा बनलेला आहे. जो अधोरेखित केला नसला तरी ...तो आहे. 

नाही. नकार. हे संपूर्ण वाक्य आहे हे समजण्यासाठी 2016 मध्ये एक अक्खा चित्रपट बनवावा लागतो. तो लोकांच्या गळी उतरावा म्हणून हिंदी चित्रपटांच्या शहेनशहाची त्यात भूमिका असावी लागते, आपल्या समाजासाठी यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही. 'मॅरिटल रेप्सना आपल्या सांस्कृतिक विश्वात जागा नाही'(!!!) असे विधान एक महिला मंत्री करतात तेव्हा समानुभूती(emapthy) या शब्दवरचा विश्वास उडून जातो.  मुळात बलात्कार हा निव्वळ पुरुषसत्ताक मानसिकतेचा परिपाक आहे हेच मानायला आपण अजून तयार नाही. आपल्यातल्या अजून कित्येकांना वाटतं की महिला, मुली, लहान बाळं ,वृद्ध स्त्रिया यांच्या कपड्यांमुळे किंवा त्यांच्या एकूण वागण्या बोलण्यातल्या 'हिंट्स' मुळेच बलात्कार होतात. या हिंट्स वरही चित्रपटात भाष्य केलेच आहे. Men will be Men, लडके है लडको जैसेही बरताव करेंगे अशी निलाजरी वक्तव्य आपण करत जातो. तथाकथित अपुऱ्या कपड्यांमुळे बाई पुरुषाचे लक्ष वेधून घेते आणि बलात्काराला स्वतःहून आमंत्रण देते असे म्हणणाऱ्यांना मला विचारावे वाटते की आजूबाजूला पहा, अनेक उघडे पुरुष पाहायला मिळतील, भर रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला लघवी करत उभे राहिलेले दिसतील, रस्त्यात कपडे बदलताना दिसतील, इतकंच काय एकट्या बाईकडे बघून दिवसा ढवळ्या मास्टूरबेट करताना दिसतील...या सगळ्यांवर स्त्रियांकडून शारीरिक अथवा मानसिक जोर जबरदस्ती होताना का दिसत नाही??? (टेस्टेस्टेरॉन सारखी पाचकळ उत्तरे देऊ नका. नाहीतर कधीच उल्लेख न केल्या जाणाऱ्या महिलांच्या orgasm विषयी चर्चेला तुम्हाला मी भाग पाडेन.)आणि पुढे हा विचार करा की  विधवा स्त्रीला कुरूप करण्याचा घाट का घातला जात असावा? सतीच्या मागे खरंच किती काळजी होती? आणि जगप्रसिद्ध प्रश्न एका परिटाच्या सांगण्यावरून रामाने सीतेची चारित्र्य परीक्षा घेतलीच ना? हे सगळं स्त्रीला असणारं लैंगिक स्वातंत्र्याला नाकारणं आहे.
इंडिपेंडंट मुलींचे Character assassination अर्थात चारित्र्य हनन हा आणखी एक महत्वाचा मुद्दा पिंकने अधोरेखित केला आहे. लोक काय म्हणतील या मानसिकतेचा जाच मुलांना फक्त शिक्षण/जॉब/व्यसन/पालकांची सेवा इत्यादी बाबतच सहन करावा लागतो. मुलींना हे तर सगळं सहन कराव लागतंच पण त्याच बरोबर एखाद्या मित्रासोबत किंवा अनोळखी मुलासोबत सोसायटी बाहेर/ बिल्डिंग खाली, घराच्या आत किंवा बाहेर/ फेसबुक वरील ओपन प्लॅटफॉर्म्स वर किंवा व्हाट्सअप ग्रुपवरही कुठेही नुसतं मनमोकळं बोलताना याचा विचार करत बोलावं लागत कि लोक काय म्हणतील? किंवा मी नुसत्या मैत्रीच्या नात्याने बोलते आहे हे समोरच्या व्यक्तीला नाही समजलं तर? तर मग काय? त्यापेक्षा जाऊदे. अस म्हणत बऱ्याच जणी मोकळंढाकळं वागणं टाळतात. आणि मग आपण बोलत राहतो ती बुजरी आहे, पोरींना चारचौघात आत्मविश्वासाने बोलता येत नाही.
माशाला पाण्याबाहेर ठेवायच आणि म्हणायचं कि अरे हे तर पोहोतच नाही,अशातली ही गत.

चित्रपटाच्या यशा नंतर आणखी एक मतप्रवाह डोकं वर काढू लागला तो म्हणजे हा कि -बघा
काहीही झालं तरी शेवटी एक पुरुषच आला ना अबला स्त्रियांच्या संरक्षणा साठी!!! आता यावर अनेक स्त्रीवाद्यांचेही म्हणणे आहे की त्याऐवजी एक स्त्री पात्र असते तर जास्त प्रभावी संदेश गेला असता. परंतु माझं व्यक्तिगत मत असे आहे की त्या ठिकाणी एखादी स्त्री आहे अथवा पुरुष हा मुद्दाच गौण व्हावा अशा समाजाची स्वप्न आपल्याला पडायला हवीत. मुळात लढा हा पुरुषसत्ताक मानसिकतेविरोधात आहे, आणि तो मातृसत्ता स्थापन करण्यासाठीचा नाही. हे लक्षात घेतलं कि खरा स्त्रीवाद कळतो. सत्ता ही कोणाचीच नसावी. प्रत्येक व्यक्ती समान पातळीवर असावी.  मग नुसता मानवतावाद का नको? स्त्रीवादाचा हट्ट का? तर साधी गोष्ट लक्षात घेऊया कि मानवतावादाला नकार नाही. तो असण्यास काही कारण नाही. पण पंचवार्षिक योजना बघा आधी Growth वर केंद्रित होत्या,मग पुढे Inclusive Growth वर आधारित झाल्या? अस का झालं? कारण आधीची वाढ ही सर्वसमावेशक नव्हती. ती सर्वसमावेशक व्हावी यासाठी दुबळ्या असणाऱ्या किंवा दुबळ्या ठेवल्या गेलेल्या घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना प्रस्थापितांच्या समान पातळीवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. तसेच हे. पुरुषसत्ताक मानसिकता ही निव्वळ पुरुषांमध्येच असते असे नाही. स्त्रियाही त्याच्या बळी आहेत. सक्षमीकरणाचे कार्यक्रम हे फक्त महिलांचे होता कामा नयेत. आधी कधीही न अनुभवलेली समानता अनुभवण्यासाठी स्त्री पुरुष दोघांनाही एकत्रितरित्या तयार करणे गरजेचे आहे. काहींच्या मते शिकलेल्या/कमावत्या मुलीला घरात लग्न करून आणले कि घरात भांडणं होतात. आता खरंतर ही भांडण होतात कारण आधुनिक विचारांची बायको हवी म्हणून उच्चशिक्षित मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांनाही हे लक्षात येत नाही कि तिची स्वप्नेही तितकी मोठी असणार, आधुनिक शिक्षण घेतलेल्या सुनेकडून त्याच त्या पूर्वापार चालत आलेल्या रांधा वाढा उष्टी काढा परंपरांच्या
अपेक्षा यांना असतात. पण दोष मात्र त्या पिढीतल्या मुलींना. जिथे अजून मानसिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वातंत्र्यही पुरेपूर स्त्रीला उपभोगता येत नाही तिथे तुम्ही लैंगिक स्वातंत्र्याचा उच्चार तरी कसा करणार? त्यामुळेच बाईकडून कोणत्याही प्रकारचा NO हा या समाजाला अपेक्षित नसतो. त्या पार्श्वभूमीवर पिंक महत्वाचा ठरवावा लागेल. हो 'ठरवावा लागेल' . पिंकपेक्षाही अधिक ठळक भाष्य करणारे चित्रपट यापूर्वीही होऊन गेले आहेत पण आपल्या समाजाची आकलनाची पातळी पाहाता अशा बडबडगीतांसारख्या सिनेमाची गरज आहेच. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उत्कृष्ट असला तरी जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर स्त्रीवादी चळवळ आणि लिंगभाव चर्चा (Gender Debate) बरीच पुढे गेली आहे.
पण पिंकच्या निमित्ताने म्हणावे वाटते...
हेही नसे थोडके!


-प्राजक्ता.