Wednesday 2 December 2020

माझं मरण.

माझं जगणं तू ‘डीकोडून’ सांगू नये तसंच #माझं_मरणंही.

तुझ्या त्या पावलांनी अमुक एक दगड तर धुडकावून लावला होता कि मग तमुक एका दगडाच्या ठेचेने इतकी काय म्हणून जखम करून घ्यायची तू ! हे मुद्दाम म्हणून तू ठरवत नाहीसंच...


पण मी सुद्धा तुझ्यासाठी ते ठरवू नये.  

निर्णय तुझा असताना,

तुझ्या विचारांच्या शिवाशिवीमध्ये माझा बघ्ये म्हणून पण सहभाग नसताना,

तुझा निर्णय

निव्वळ त्या निर्णयाचे नाम माहित्ये म्हणून

त्यावर बोलण्यासाठी त्याच्या अलीकडे आहे म्हणून

लिहिता वाचता आणि टाईपता येतं म्हणून

आताच्या क्षणात भावना आणि विचारांच्या रस्सीखेचेने ब्रेक घेतलेला आहे म्हणून

या आयुष्यातसुद्धा ‘तसे’ क्षण आले पण बघ ‘निभावून नेलंय’ म्हणून

मी

निकालात काढते तुझं – त्यांचं सगळ्यांचंच #मरण.

हे विसरून

कि हे 'ते तसे' नि ते 'हे असे' यात साम्य नसतंच कधी.

तसे आणि तसेच जरी असले तरी बदलत जाते त्याची खोली उंची रुंदी घुसमट

माझ्या तुझ्यासाठी;

मी विसरते

कि माझं निभावलेलं काय किंमत घेऊन गेलं

का भरली ती किंमत

कोणी भरली

निभावल्या म्हणून भावल्या का सगळ्याच वाटा?

मी निभावलं याचं तुला कौतुक आहेच

पण मी जेत्त्याच्या आवेशात मागत राहते तुझ्याकडून तुझ्या निर्णयांचा हिशोब...

तू इथे नसताना.

कारण मला दिसत राहतं

मी मागे घेतलेलं पाउल

किंवा

कधीच न सोसावी लागलेली ती दिशा.

मला होता येतं कोर्ट

आणि म्हणता येतं तुला मूर्ख, भेकड

गुन्हेगार

हे विसरून कि मला कधी कोणाच्या

पुनर्वसनाचं केंद्रही होता आलेलं नाही.


-प्राजक्ता


#एकमुक्तती.


#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते

Monday 11 May 2020

'ब्रेक के बाद...???...

पडल्या पडल्या किंवा तोल गेल्याच्या क्षणाला आपला पहिला प्रयत्न असतो की हाताला येईल ते धरून स्वतःला सावरणे...
कधी सावरतो आपण स्वतःला तर कधी फसतो प्रयोग...
कधी पडणं इतकं गंभीर नसतंच की प्रयोग फसला तरी काही नुकसान व्हावं आपलं...
कधी तंगडं मोडून हातात पण येऊ शकतं इतकं लागतं.

अचानक आलेला हा काळ...ही परिस्थिती...
अनिश्चितता !
या सगळ्यातून प्रत्येक जण स्वतःचा तोल सावरत आहे.
ज्यांनी सावरला ते तो टिकवण्याचा प्रयत्नात आहेत.
आपापले डिफेन्स मेकॅनिझम शोधून काढले आपण.
सोशल मीडिया चॅलेंजेस झाले,
इनो-मैदा-रवा संपवणाऱ्या पाककला स्व-स्पर्धा झाल्या,
आधी 'विषयां'साठी 'वेबिनार्स' मग 'वेबिनार्स'साठी 'विषय' घेऊन झाले...

या साऱ्यात "Stay at home' ला कंटाळण्याची "luxury" असणाऱ्या आम्हाला कोणीतरी
"Safe at home ...Not stuck at home" पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला.

...'तथाकथित' 'सामान्य'पणे 'विनाव्यत्यय' (?) चालू असणाऱ्या जीवनाच्या प्रवाहात,
अचानक खंड पडल्याने झालेली उलाढाल प्रचंड असली तरी आतापर्यंत मिळालेल्या सक्तीच्या सवडीमुळे 'भविष्यातील नव्या नॉर्मल'चा विचार...
खरंतर पुनर्विचार करायची वेळ आणि जबाबदारी आपल्यावर आहे.

जबाबदारी का असे विचारालं तर भाकरीच्या चंद्रासोबत रेल्वेखाली आलो नाही आपण...
ते टाळू शकलो नाही आपण...
तर किमान त्यानंतर उरलेल्यांचे आयुष्य सुकर असणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी खारीचा का होईना पण स्वतःचा वाटा उचलावा ही 'किमान मूलभूत क्षमता' असू शकते माणूस म्हणवून घेण्यासाठी...

दूर दूर पर्यंत कधी शक्यता म्हणूनही ज्या मनात आल्या नसतील त्या या काळाने खऱ्या करून दाखवल्या आहेत...
दर महिन्याला / आठवड्याला / दिवसाला नवीन वस्तूंचा भरणा करणारे आपण सुरुवातीला नाराजीसह,
मग जागरूकपणे मिनिमॅलिस्टिक जीवन शैलीशी जवळीक साधत जगायला शिकलो...
कारण प्रश्न 'सरव्हायवलचा' होता...
टिकून राहण्याचा.

जेव्हा स्वतःला टिकवायचं असतं तेव्हा
कितीही घट्ट मुळं रोवलेल्या धारणा बदलायला वेळ लागत नाही
हे या काळातलं महत्वाचं फलित आहे.
'स्वतःला टिकवणं' याची व्याख्या जितकी व्यापक होत जाईल तेवढं समूह/समुदाय/प्रजाती म्हणून मनुष्यप्राणी टिकणं शक्य होईल हे ही या काळात अधोरेखित झालेलं आहे.
पण 'समाज' म्हणून या काळाच्या कसोटीवर किती खरे उतरलो आपण याचं उत्तर काय??

आतापर्यंत 'समूहा'च्या भावनेलाच 'समाज' मानून खपवल्या आपण खूप गोष्टी...
मिळालेला हा 'अवकाश' किमान
'ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात...' असा रोजचाच
आणि त्यामुळेच सरावलेला,
कळला न कळल्यासारखा ठरणार नाही...
एवढं आपण (किमान) बघूया.

-प्राजक्ता
#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते...

Sunday 22 March 2020

टिकून राहताना...

टिकून राहायला समूहाचा भाग असल्याची खात्री करत राहावं लागतं.
त्यासाठी जबाबदाऱ्यांचे अतिसुलभीकरण करणाऱ्या म्होरक्याचा फार उपयोग होतो.

अर्थात इथे समूहाने म्होरक्या वापरला स्वतःच्या जीवाच्या शांतीसाठी, गिल्टट्रीपमधल्या शॉर्टकटसाठी, दिवसभराचा त्रागा बाहेर पाडण्यासाठी कि म्होरक्याने वापरून घेतले समूहाला कशाकशासाठी…

भावनेचं राजकारण नको म्हणतो आपण …
पण भावनाच राजकारण असली तर?
प्रत्येक भावनेला सत्ता हवी असते आपली. स्वतःची मालकी.

म्हणजे माण्साचं टिकणं हे स्व-च्या आणि समूहाच्या भावनेच्या राजकारणाच्या पटण्या-न-पटण्यानुसार ठरत असावं का?...

लांब,वेगळं, अंतरावर राहूनही समूहाशी जोडलेलं आहे असं वाटण्याच्या मागील असुरक्षिततेचं भांडवल करून एकदा सामुहिकाच्या भावनेचे पुन्हा रिचार्ज केलं म्हणजे मग आपापल्या ‘छिद्रांत’ जायला नवी उर्जा मिळते कि कारण ?

जबाबदाऱ्या प्रतीकांच्या रुपात सजवायला बऱ्या पडतात. मिरवता येतात. निभावाव्या लागत नाहीत.


- प्राजक्ता.

Sunday 12 January 2020

काळ.

काळाच्या कुठल्या प्रहरी
आपण जागं व्हायचं हे कळत नाही.
कोणत्याही एका प्रहराची निवड केलीत
तर मग इतर वेळेला कुठे होती तुमची जागरूकता
हे विचारायला घड्याळांचे अनेक काटे धजावतात.
त्यांना रोखता येत नाही...
कारण त्यांनी ठरवलेल्या दिशेने
ते जात येत राहत असतात.
त्यांचं 'चालू असणं' हेच त्यांच्या प्रामाणिकता किंवा तत्सम आदर्श मूल्यांचं प्रशस्तीपत्रक असतं.
त्याला सलाम करावा हे गृहीतच.
हे निर्विवाद.

तर,
काळ भीषण आलाय.
आपण भीषण झालोय किंवा आपण
: तुम्ही-आम्ही सगळेच.
मुळचेच भीषण आहोत
हे आता फक्त उघड्यावर यायला लागलं आहे.

काळ 'माहिती'चा आहे.
तथ्ये गोळा होताहेत.
विखुरली जात आहेत.
शिवाय, काळाला 'तंत्रज्ञाना'ची जोड आहे.
जी तथ्ये आवडत किंवा पटत नाहीत ती बदलली जात आहेत.

जागं व्हायचं तर मग सगळी तथ्ये तुम्हाला माहिती हवीत.
त्यावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव तुम्हाला कळायला हवा.
तथ्याचे तथ्य तपासण्यासाठी
पुन्हा आधार म्हणून
नवी तथ्ये शोधायला यायला हवीत.

मिळाली नाहीत? सवड नाही? शक्य नाही?
मग विश्वासाच्या आधारे धरायची एखादी पारंबी.
मुकाट्याने.

'जगबुडी होणार' या सुंदर आशेवर
वाट पहायची
निसर्ग खवळेल पाणी बनून.
काळ लोटेल...
काळाला लोटेल...
आणि पूर्ववत होईल
व्यक्तीविरहित समष्टी
तेव्हा कळेल
कोणी धरलेल्या पारंब्या आणि टिकले एकीने...
आणि कोण फसलं
नि सुटून गेलं प्रवाहातून ...
काठ्यांना आपलं मानून.

-प्राजक्ता.
#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते.