Monday 11 May 2020

'ब्रेक के बाद...???...

पडल्या पडल्या किंवा तोल गेल्याच्या क्षणाला आपला पहिला प्रयत्न असतो की हाताला येईल ते धरून स्वतःला सावरणे...
कधी सावरतो आपण स्वतःला तर कधी फसतो प्रयोग...
कधी पडणं इतकं गंभीर नसतंच की प्रयोग फसला तरी काही नुकसान व्हावं आपलं...
कधी तंगडं मोडून हातात पण येऊ शकतं इतकं लागतं.

अचानक आलेला हा काळ...ही परिस्थिती...
अनिश्चितता !
या सगळ्यातून प्रत्येक जण स्वतःचा तोल सावरत आहे.
ज्यांनी सावरला ते तो टिकवण्याचा प्रयत्नात आहेत.
आपापले डिफेन्स मेकॅनिझम शोधून काढले आपण.
सोशल मीडिया चॅलेंजेस झाले,
इनो-मैदा-रवा संपवणाऱ्या पाककला स्व-स्पर्धा झाल्या,
आधी 'विषयां'साठी 'वेबिनार्स' मग 'वेबिनार्स'साठी 'विषय' घेऊन झाले...

या साऱ्यात "Stay at home' ला कंटाळण्याची "luxury" असणाऱ्या आम्हाला कोणीतरी
"Safe at home ...Not stuck at home" पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला.

...'तथाकथित' 'सामान्य'पणे 'विनाव्यत्यय' (?) चालू असणाऱ्या जीवनाच्या प्रवाहात,
अचानक खंड पडल्याने झालेली उलाढाल प्रचंड असली तरी आतापर्यंत मिळालेल्या सक्तीच्या सवडीमुळे 'भविष्यातील नव्या नॉर्मल'चा विचार...
खरंतर पुनर्विचार करायची वेळ आणि जबाबदारी आपल्यावर आहे.

जबाबदारी का असे विचारालं तर भाकरीच्या चंद्रासोबत रेल्वेखाली आलो नाही आपण...
ते टाळू शकलो नाही आपण...
तर किमान त्यानंतर उरलेल्यांचे आयुष्य सुकर असणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी खारीचा का होईना पण स्वतःचा वाटा उचलावा ही 'किमान मूलभूत क्षमता' असू शकते माणूस म्हणवून घेण्यासाठी...

दूर दूर पर्यंत कधी शक्यता म्हणूनही ज्या मनात आल्या नसतील त्या या काळाने खऱ्या करून दाखवल्या आहेत...
दर महिन्याला / आठवड्याला / दिवसाला नवीन वस्तूंचा भरणा करणारे आपण सुरुवातीला नाराजीसह,
मग जागरूकपणे मिनिमॅलिस्टिक जीवन शैलीशी जवळीक साधत जगायला शिकलो...
कारण प्रश्न 'सरव्हायवलचा' होता...
टिकून राहण्याचा.

जेव्हा स्वतःला टिकवायचं असतं तेव्हा
कितीही घट्ट मुळं रोवलेल्या धारणा बदलायला वेळ लागत नाही
हे या काळातलं महत्वाचं फलित आहे.
'स्वतःला टिकवणं' याची व्याख्या जितकी व्यापक होत जाईल तेवढं समूह/समुदाय/प्रजाती म्हणून मनुष्यप्राणी टिकणं शक्य होईल हे ही या काळात अधोरेखित झालेलं आहे.
पण 'समाज' म्हणून या काळाच्या कसोटीवर किती खरे उतरलो आपण याचं उत्तर काय??

आतापर्यंत 'समूहा'च्या भावनेलाच 'समाज' मानून खपवल्या आपण खूप गोष्टी...
मिळालेला हा 'अवकाश' किमान
'ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात...' असा रोजचाच
आणि त्यामुळेच सरावलेला,
कळला न कळल्यासारखा ठरणार नाही...
एवढं आपण (किमान) बघूया.

-प्राजक्ता
#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते...