Sunday 12 January 2020

काळ.

काळाच्या कुठल्या प्रहरी
आपण जागं व्हायचं हे कळत नाही.
कोणत्याही एका प्रहराची निवड केलीत
तर मग इतर वेळेला कुठे होती तुमची जागरूकता
हे विचारायला घड्याळांचे अनेक काटे धजावतात.
त्यांना रोखता येत नाही...
कारण त्यांनी ठरवलेल्या दिशेने
ते जात येत राहत असतात.
त्यांचं 'चालू असणं' हेच त्यांच्या प्रामाणिकता किंवा तत्सम आदर्श मूल्यांचं प्रशस्तीपत्रक असतं.
त्याला सलाम करावा हे गृहीतच.
हे निर्विवाद.

तर,
काळ भीषण आलाय.
आपण भीषण झालोय किंवा आपण
: तुम्ही-आम्ही सगळेच.
मुळचेच भीषण आहोत
हे आता फक्त उघड्यावर यायला लागलं आहे.

काळ 'माहिती'चा आहे.
तथ्ये गोळा होताहेत.
विखुरली जात आहेत.
शिवाय, काळाला 'तंत्रज्ञाना'ची जोड आहे.
जी तथ्ये आवडत किंवा पटत नाहीत ती बदलली जात आहेत.

जागं व्हायचं तर मग सगळी तथ्ये तुम्हाला माहिती हवीत.
त्यावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव तुम्हाला कळायला हवा.
तथ्याचे तथ्य तपासण्यासाठी
पुन्हा आधार म्हणून
नवी तथ्ये शोधायला यायला हवीत.

मिळाली नाहीत? सवड नाही? शक्य नाही?
मग विश्वासाच्या आधारे धरायची एखादी पारंबी.
मुकाट्याने.

'जगबुडी होणार' या सुंदर आशेवर
वाट पहायची
निसर्ग खवळेल पाणी बनून.
काळ लोटेल...
काळाला लोटेल...
आणि पूर्ववत होईल
व्यक्तीविरहित समष्टी
तेव्हा कळेल
कोणी धरलेल्या पारंब्या आणि टिकले एकीने...
आणि कोण फसलं
नि सुटून गेलं प्रवाहातून ...
काठ्यांना आपलं मानून.

-प्राजक्ता.
#शब्दांचेथोडेऐकेनम्हणते.