Sunday 25 October 2015

"एकटीने" ...

एकटीने दुरचा प्रवास करणं, नाटक सिनेमाला जाण, रेस्तरॉमधे जाऊन हव्या त्या पदार्थांचा फडशा पाडणं, फार कशाला जवळच्या टपरीवर जाऊन एक स्पेशल मारणं...कोशातून बाहेर आणतात आपल्याला. 'सोबती'च्या 'सुरक्षा कवचा'तून बाहेर काढतात. आपल्याला वाटत सोबतीची सवय मोडली की जमेल अस एकटं राहण. एकटं पडण आणि एकटं राहण पसंत करणं यांतला फरक आत्मसात करायलाही वेळ लागतो खरतर. पण एकटीने हवं ते करायला सुरुवात केल्याशिवाय सोबतीची सवय...किंवा गरज मोडत नसते.

नुकताच एकटीने नाटक पाहण्याचा अनुभव घेतला आणि जाणवलं ; ITS NOT A BIG DEAL! खरंच इतकी काही मोठी गोष्ट नाहीए ती. सुरुवात कटिंग पासून झाली होती, म्हणजे आपल्याला असणारी चहाची गरज आणि इतरांची गरज याचा ताळमेळ साधत बसण्याची अनाठायी कसरत नकोशी झाली आणि अनावधानानेच सोबतीपेक्षा चहा महत्वाचा झाला. पुढे प्रवास केला आणि मग जाणवलं सोबतींमध्ये रमण्यापेक्षाही इतर बऱ्याच गोष्टी असतात अनुभवण्यासारख्या. भीती वाटते कधीतरी, मग ‘धाडस’ वगैरे सारखं काहीतरी दाखवून निभावून नेतो आपण. आणि मग तो एक मापदंड बनतो. कुठल्या पातळीपर्यंत आपली धाडस-क्षमता गेली आहे याचा.

कधी रस्त्यावरच्या भांडणात पडतो आपण; तेव्हा तिर्हाइत पुरुषाने “बरं झालं तू मधे पडलीस, कसंयना लेडिजचा matter (नवरा-बायकोच भांडण ज्यात नवरा त्या बाईला मारतोय हा matter!) असला की आम्ही (पुरुष) मध्ये पडलो तर बर नाय दिसत” असं म्हणेपर्यंत आपल्यालाही कळत नाही की बाह्यदर्शी आपण समाजाच्या ‘स्त्री’ संकल्पनेच्या अपेक्षित धाडस-क्षमतेहून जास्त काही केले आहे. एकटं राहील की खरं कळत आपल्यातल्या आत्मविश्वासाची मुळं कुठंवर खोल गेली आहेत.

सुरुवातीला हे सारं नेणिवेतून जाणीवेत येइपर्यंत आपण काही विशेष करतोय हे लक्षात येत नाही. मग पुढे इतरांच्या नजरांमधून कधी काळजी, कधी हेवा, कधी आश्चर्य, कधी दया (की बापरे! बिचारी....एकटी) हे आपल्याला दिसू लागतं. बाकी सारं आपल्याला हसण्यावारी नेता आलं तरी लोकांना आपला हेवा वाटतो हे पाहून कधी आपला अहम सुखावतो. 'ग ची बाधा' होऊ लागते. आपल्याला कोणाची गरज नाही असंही कधी वाटू शकतं. अर्थातच Aristotle ने जे ‘MAN’ विषयी मांडलं ते खरंतर सर्व HUMANS ला लागू आहे. Womenसुद्धा सामाजिक प्राणीच असतात ना.

आपण सारे अशी बेटे आहोत जी वरवर पाहता विभक्त दिसतात पण पाण्याखाली सर्व एकमेकांशी सलंग्नच असतात. त्यामुळे इतरांची गरज नाही ही धारणा फार काळ टिकत नाही. 'ग ची बाधा' गेली हे कसं समजावं? तर एरवी एकटे जाण्यास तयार असणारे आपण खरंच कंटाळा आला / एकटे वाटत असेल / किंवा उगाचच सोबत हवी वाटत असेल तेव्हा विनासायास जवळच्या व्यक्तींना ‘सोबत येणार का?’ अशी विचारणा करू शकतो. शिवाय समोरच्या व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्यही देतो.

एकटं राहणं पसंतीस पडू लागलं म्हणजे ‘अगदी माणूसघाणी झाली ही तर’ असं म्हणणं किती बाळबोध होईल हे तर सांगायला नकोच. तरी स्वातंत्र्याची खरी चव चाखायाची तर सर्वच मानसिक बेड्या तोडायला हव्यात हे याच एकटं राहण्यातून कळतं. यामुळे निव्वळ आपलंच स्वातंत्र्य टिकतं असं नाही,तर एरवी फक्त आपल्याला हवं म्हणून समोरच्या व्यक्तीने तिचा वेळ आपल्याला देण्याची जी नकळत सक्ति आपण त्यांच्यावर करतो त्यापासून त्यांचीही मुक्तता होते.

आपल्यावरच्या प्रेमापोटी ते येतात सोबत किंवा आपण देतो त्यांना सोबत वगैरे युक्तिवाद हे प्रेमाची अजून अद्याक्षरे गिरावणार्यांचे युक्तिवाद वाटतात. आपली खरी सोबत करणारी माणसे आपल्याला कधीच अधू बनवत नाहीत.आपल्याला त्यांच्यावर किंवा इतरांवर अवलंबून रहावं लागेल अशी मानसिकता तयार होऊ देत नाहीत.खरी सोबत किंवा प्रेम करणारी माणसं ही आपल्याही नकळत आपल्याला आपल्या स्वतःसोबत जगायला शिकवतात.जगाने पाठ फिरवली म्हणून ‘एकला चलो रे’चा झेंडा हाती घेण्याची वेळ येते काहींवर;पण सुदैवाने तशी वेळ आली नसली तरी एखादा प्रयोग म्हणून 'आपण' स्त्रियांनी तसेच मुलींनी अश्या ‘एकटी’च्या सफरीचा अनुभव घ्यायलाच हवा.


ता.क़.- इथे इतकं स्त्री-विशिष्ट बोलण्यास कारण की पुरुषांना व मुलांना ही संधी बाहेरून सहज मिळते. त्याचा लाभ घेणं जितके पुरुषांना सुकर आहे तितके स्त्रियांना नाही. उदाहरणार्थ-सुरक्षिततेचा मुद्दा.
-प्राजक्ता.

6 comments:

  1. Chan julun alay sahaj sundar ...mi mulga asun mala he samjayla vel gela....tumhi muli great ahat

    ReplyDelete
  2. गेली ४-५ वर्षं एकटीने प्रवास करणं -सिनेमा,नाटक बघणं याचा अनुभव घेताना जे जे काही वाटलं ते डायरीमधे लिहिण्याचे अनेक प्रयत्न केले.त्यात उरलेलं खूप काही आहे अजून जे शब्दात उतरवता आलेलं नाहीये.त्या उरलेल्यातलं बरंच ह्या लेखात शब्दरूप झालंय.अनुभव वेगळे असले ,ठिकाणं वेगळी असली तरी भावना त्याच असतात … वैश्विक… हे पटलं या निमित्तानं पुन्हा एकदा.
    खूप छान .

    ReplyDelete